स्वामी लीला
स्वामी भक्त हो !! आजची स्वामी वाणी !! स्वामी महाराज हे गुरुतत्व आहे.. अनेक युगांत त्यांनी विविध शरीर धारण केले.. ह्यालाच आपण अवतार म्हणतो.. अक्कलकोट नगरीत ते सगुण रुपात प्रगट झाले.. स्वामींच्या शिकवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वामी कृतीद्वारे शिकवत.. अनुभव देवून शिकवत.. असो. स्वामी महाराज असेच एके दिवशी सकाळी सकाळी श्री गणपतराव जोशी ह्यांच्या घरी आले.. प्रत्यक्ष परब्रम्ह आज घरी आले हे बघून गणपतरावांस मोठा आनंद झाला.. त्यांनी स्वामींचे स्वागत केले.. स्वामींना स्नान घातले आणि पिवळ्या रंगाचे सोवळे नेसवून आसनावर बसविले.. अत्यंत मनोभावे स्वामींची षोडशोपचार पूजा केली.. आणि नैवेद्याचे ताट जेवणासाठी समोर ठेवले… गणपतरावांनी नैवेद्याचे ताट स्वामींच्या समोर ठेवताच गणपतरावांच्या मनात शंकेचा विचार आला.. “हे रेशमी सोवळ इतकं महाग आहे.. स्वामी महाराज भोजन झाल्यानंतर इतके अमुल्य सोवळे कोणालाही देवून तर टाकणार नाही ना…!! ” स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज सर्वान्तर्यामी आहेत.. गणपतरावांच्या मनातील बोलणे स्वामींना तात्काळ समजले आणि स्वामींनी लागलीच नेसलेले सोवळे काढले आणि गणपतरावांकडे फेकून दिले… आणि बोलले कि “ हे घे तुझे सोवळे !! ” आणि स्वामी दिगंबर होऊन चालते झाले.. गणपतरावांस जरा गोंधळल्या सारखे झाले आणि हे काय सुरु आहे काहीच समजले नाही… आणि ते धावत जावून स्वामींना न जाण्याबद्दल विनंती करू लागले.. तेव्हा स्वामी पुन्हा बोलले “ तुझ्या मनात सोवळ्या बद्दल शंका आली म्हणून आम्ही चाललो आहे..!! ” असे बोलून स्वामी बाहेर रस्त्याने निघून गेले.. हा सर्व प्रकार सभोवतालची मंडळी बघत होती.. इतक्यात तेथील तात्या वैद्य नावाच्या अनन्य भक्तानी स्वामींना प्रार्थना केली.. तात्यांची तळमळीची प्रार्थना स्वामींनी मान्य केली आणि भक्तवत्सल स्वामी माउलीने तात्यांच्या घरी भोजन केले.. गणपतरावांस आपली चूक समजली.. स्वामींमहाराज हे फक्त अनन्य भक्तीचे भुकेले आहे हे त्यास समजले..
बोला अनंतकोटी ब्रम्हांडनायक परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो ! !आजची स्वामी वाणी जरीही छोटी असली तरी त्यातील स्वामींनी आपणास खुप खोल आणि महत्वाचे मार्गदर्शन केलेले आहे.. स्वामी आज आपणास स्पष्ट सांगत आहेत कि “ बाळानो तुम्हाला खरोखर स्वामीमय जीवन पाहिजे असेल तर अविश्वास सोडा.. शंका नका घेऊ.. आसक्ती सोडा कारण कोणतीही भौतिक वस्तू वा गोष्ट हे प्रेम..आनंदाचा स्त्रोत नसून मीच प्रेम.. शांती.. समृद्धी.. आनंदाचा स्त्रोत आहे !! ”
आज स्वामींनी आपणास हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे कि आसक्ती हा मनाचा विकार आहे.. आणि ह्या मुळे अविश्वास निर्माण होतो… शंका निर्माण होतो.. बघा ना !! वरील स्वामी लीलेत गणपतरावांच्या घरी परब्रम्ह आले तरीही त्यांचे मन त्या सोवळ्यात आसक्त होते.. आणि त्या आसक्तीमुळे प्रत्यक्ष परब्रम्हच्या सानिध्याला मुकावे लागले… आपल्या जीवनात सुद्धा असेच होते.. जेव्हा जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा स्वामी आपल्या प्रार्थना ऐकतात आणि आपल्याला हवी असलेली जगातील भौतिक वस्तू देतात.. आणि जेव्हा आपली इच्छा पुर्ण होते तेव्हा मनाला आनंद होतो.. परंतु मन त्या वस्तुलाच आनंदाचा स्त्रोत मानू लागते.. आणि ती वस्तू सतत सोबत रहावी हि अविवेकी इच्छा प्रगट करते.. स्वामी भक्त हो !! मनाचे त्या वस्तूला आनंदाचा स्त्रोत मानणे आणि ती वस्तू आपल्या जीवनातून जावूच नये असा अट्टहास धरणे… हे जे मनाचे अज्ञान आहे ह्यालाच आसक्ती म्हणतात.. attachment म्हणतात.. जितकी जास्त आसक्ती.. तितके मोठे दु:ख.. आणि ह्या आसक्ती मुळे आपण मूळ आनंदाच्या स्त्रोता पासून दूर जातो… स्वामींपासून दूर जातो.. खरतर आनंदाचा स्त्रोत आपल्या हृदयात आहे.. आणि हे विश्व आणि त्यातील भौतिक वस्तू ह्या त्याच्या प्रतिबिंब आहे.. जसे तुम्ही स्वत:चे सौदर्य जेव्हा आरशात बघतात तेव्हा तुम्हाला हि समज असते कि हा आरसा आहे आणि त्यात माझे प्रतीबिंब.. अगदी तसेच आनंदाचा स्त्रोत हा हृदयात आहे.. आणि समोरील वस्तू हे त्याचे प्रतिबिंब आहे.. अहो बघा ना जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा सभोवतालचे सर्वच विश्व आनंदी दिसते..असो. वरील लीलेत गणपतरावांच्या घरी प्रत्यक्ष स्वामी महाराज म्हणजेच आनंदाचा.. प्रेमाचा.. समृद्धीचा स्त्रोत घरी आला.. पण गणपतरावांचे मन सोवळ्यावर आसक्त होते.. आणि ह्याची जाण व्हावी म्हणून स्वामी निघून गेले.. म्हणून स्वामी भक्त हो !! आपल्या जीवनात ज्या भौतिक वस्तू येतात त्या निमित्त आहेत आणि परिवर्तनीय आहेत हि समज ठेवून त्यांचा वापर करायचा आहे.. म्हणजे दु:खाचा प्रश्नच राहणार नाही..आणि जरी आले तर लवकर विलीन होईल.. !! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या ..!! “ हे परब्रम्हा, तू मला पृथ्वीवर हे प्रापंचिक जीवन दिले आहे… ह्यात गरजा पण निर्माण केल्या आहेत..!! हे माउली..!! माझ्या गरजेनुसार मी तुझ्याकडे भरपूर मागतो आहे आणि तू सुद्धा मला सर्व देतो आहेस..!! परंतु ह्या बाळाची तुला एक विनंती आहे… जेव्हा जेव्हा तू माझे मागणे पूर्ण करणार.. मला भौतिक गोष्टी देणार.. त्यात मध्ये माझे मन गुंतवू नकोस.. ते सर्व निरासक्तीच्या डब्यात (Detachment box) मध्ये दे..!! म्हणजे भविष्यात ते गेले तरी दु:ख होणार नाही !! आणि तुझ्या अनन्य भक्तीच्या आनंदापासून.. तुझ्या चरणापासुन दूर होणार नाही !!!”






