मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीसाठी सुरू असलेल्या रेड डॉट चॅलेंज कॅम्पेनच्या अहवालाचे प्रकाशन डॉ. यास्मिन अली हक (प्रतिनिधी संयुक्त राष्ट्र बाल कोष भारतीय कार्यालय) यांच्या हस्ते आज (ता. २५ जून) मंत्रालयात करण्यात आले. या कार्यक्रमा महाराष्ट्र युनिसेफ च्या मुख्य क्षेत्राधिकारी श्रीमती राजेश्वरी चंद्रशेखर, वॉश अधिकारी युनिसेफ मुंबईचे श्री. युसुफ कबीर, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिएसटीएफ श्री. रामनाथ सुब्रमण्यम, कार्यकारी संचालक श्रीमती श्वेता शालिनी, कार्यकारी संचालक व्हिएसटीएफ श्री. उमाकांत दांगट, अभियान व्यवस्थापक व्हिएसटीएफ दिलीपसिंग बायस व युनिसेफ व व्हिएसटीएफ चे अधिकारी उपस्थित होते.
मासिक पाळी संदर्भात समाजामध्ये बऱ्याच गैरसमजूती आहेत. त्या दूर करून किशोर मुली व महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व युनिसेफ मार्फत दिनांक २८ मे ते ३० जून, २०१९ दरम्यान रेड डॉट चॅलेंज कॅम्पेन राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परितर्वन अभियानातील १००० गावांमध्ये विविध उपक्रम घेऊन किशोर मुली व महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनाचे तांत्रिक मार्गदर्शन करून, त्यांचे ज्ञान व कौशल्य वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.
ग्रामीण व विशेषत: आदिवासी भागांतील किशोर मुली व महिलांच्या मासिक पाळी दरम्यान अनेक गैरसमजूती, जुन्या चालीरीती व अंधश्रध्दा आहे. वास्तविक त्या ४ दिवसांमध्ये किशोर मुली व महिला यांना सकस आहार व आरामाची गरज असते. तसेच त्यांनी वैयक्तिक स्वच्छता जपली पाहीजे. या कार्यात महिलांना कुटुंबाकडून सहकार्याची मदतीची आवश्यकता असते. तथापि, मासिक पाळी ही बाब कुटुंबामध्ये लपवली किंवा गोपनीय ठेवली जाते. आई-वडिल किंवा पती पत्नींमध्ये या विषयावर सकारात्मक संवाद होताना दिसत नाही. परिणामी, त्याचा विपरीत परिणाम किशोर मुली व महिलांच्या आरोग्यावर होतो. यावर प्रतिबंध व्हावा व कुटुंबियांमध्ये या विषयावर सकारात्मक सुसंवाद निर्माण व्हावा, यासाठी ही मोहीम राज्यातील गावांमध्ये घेण्यात आली.
या मोहीमेअंतर्गत जागतिक मासिक पाळी दिना रोजी राज्यभरातून रेड डॉट अभियान घेऊन मोहीमेचा प्रारंभ करण्यात आला. गावस्तरावरील किशोर मुली, गर्भवती माता, स्तनदा माता व सर्व साधारण महिलांना अंगणवाडी व शाळांमध्ये विविध उपक्रम घेऊन, मासिक पाळी संदर्भात समूपदेशन करण्यात आले. तसेच महिलांना मासिक पाळी व्यवस्थापनावरील काही चित्रफीत दाखवून त्यांचे ज्ञान व कौशल्ये वाढविण्याचाही प्रयत्न करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये दिनांक २८ ते ३० जून दरम्यान विविध उपक्रमांचे गावस्तरावर आयोजन करण्यात आले. त्यामध्ये युनिसेफ मार्फत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील महिला ग्राम परिवर्तक यांची क्षमता बांधणी प्रशिक्षण आयोजित केले गेले. दिनांक ३१ मे ते १५ जून २०१९ दरम्यान प्रशिक्षित महिला ग्राम परिवर्तकांनी आपल्या ग्राम पंचायतींमध्ये गावातील किशोरी महिला व इतर महिलांमध्ये विविध जनजजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यानंतर १५ ते ३० जून दरम्यान शाळा स्तरावर किशोर मुलींना मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता ठेवण्ण्यासाठी संवादात्मक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.
या मोहीमध्ये मासिक पाळीसंदर्भात किशोर मुली व महिलांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांना विविध विषयांवर माहिती देण्यात आली. त्यामध्ये किशोरावस्थेतील शारीरिक व मानसिक बदल व आत्मविश्वास निर्माण करणे, मासिक पाळी दिवसात आरोग्याची काळजी व पोषण आहार, वैयक्तिक स्वच्छता जपणे, सॅनिटरी नॅपकीनचा वापर करणे, मासिक पाळीसंदर्भातील गैरसमजूती व अंधश्रध्दा दूर करणे अशा विषयांवर जनजागृती करण्यात आली. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी राज्यातील ५५ महिला ग्रामपरिवर्तक व २० जिल्हा समन्वयक यांची निवड करून, त्यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. या मोहिमेमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनातील १००० गावांमध्ये ही मोहीम सुरू असून, त्यातून १५० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीतील ७५०० पेक्षा जास्त किशोर मुली, महिला व पुरुषांना मासिक पाळी व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती देण्यात आली आहे.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




