स्वामी लीला
अक्कलकोट मध्ये एकदा माघ गुरुप्रतीपदेच्या दिवशी उत्सव सुरु होता.. त्या वेळेला ब्राम्हण भोजनाचा कार्यक्रम ठरलेला होता… ह्या साठी मल्लू नावाच्या गवळ्याकडुन दुप्पट किंमत देवून दुध विकत घेतले होते.. मल्लू गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी मिसळले.. त्यामुळे सर्व दुध नासून गेले.. दुध नासल्या नंतर सर्व सेवेकरी मंडळी स्वामींकडे आली आणि स्वामींना सांगू लागले कि “ महाराज.. त्या मल्लु गवळ्याने दुप्पट किंमत घेऊन सुद्धा दुधात पाणी टाकले.. आणि त्या मुळे सर्व दुध नासून गेले.. आता काय करावे महाराज ? ” स्वामी भक्त हो ! सेवेकरी मंडळींनी स्वामींना अशी विनंती करताच त्याच क्षणाला तिकडे चमत्कार झाला.. मल्लुच्या पंधरा वीस म्हशी होत्या.. त्या अचानक दुध द्यायच्या बंद झाल्या.. त्यांच्या स्तनातून रक्ताच्या धारा सुरु झाल्या.. हे बघून मल्लु भयभीत झाला.. त्याने पुष्कळ औषधोपचार केले पण त्यास काही गुण नाही आला.. शेवटी त्यास आपल्या लोभी कर्माचा पश्चाताप झाला आणि धावत स्वामींच्या दरबारात आला.. आणि स्वामींचे चरण घट्ट पकडले.. आणि रडत रडत स्वामींना बोलू लागला “ महाराज.. मला क्षमा करा.. माझे अपराध क्षमा करा..!! आज पासून मी कधीच लबाडी करणार नाही..!! ” त्यावेळेला दयाघन समर्थांना त्याची करुणा आली आणि समर्थ हसून बोलले.. “ जा सर्व बरे होईल.. !! ह्या पुढे अशी लबाडी नको करू !! ” परब्रम्ह स्वामींची हि आधार देणारी वाणी ऐकताच मल्लुला धीर आला.. आणि तो स्वामीचरणाचे तीर्थ आणि थोडा अंगारा घेवून आपल्या गोठ्यात आला.. आणि हे तीर्थ आणि अंगारा म्हशींना लावले.. तोच चमत्कार झाला..
सर्व म्हशी पूर्वी सारख्या दुध देवू लागल्या..!! त्यानंतर मात्र मल्लु पेठेमधील मठात एक शेर दुध स्वामींच्या नैवेद्या साठी आणून देत.. बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी
श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी महाराज आपले गुरु आहेत.. हे गुरुतत्व आहे.. अनंत कोटी ब्रम्हांडात ज्ञात अज्ञात जीवांना मार्गदर्शन करण्याचे कार्य हे गुरुतत्व सतत करत आहेत.. आजच्या स्वामी लीलेतून स्वामी आज आपणास असंख्य बोध देत आहेत.. पैकी आपण करत असलेले काम हे अत्यंत प्रामणिकपणे करणे.. त्यात आपली संपूर्ण क्षमता वापरणे आणि शेवटी त्याचे कर्ते पण स्वामीना देणे.. हि अनन्य भक्तीची प्रेरणा स्वामी आपणास देत आहेत.. खरंतर आपण स्वामींचे बाळ आहोत.. प्रत्येकाचे खास वैशिष्ट्य आहे.. आपण पृथ्वीवर एक विशिष्ट पात्र निभावत आहोत.. हे पात्र निभावतांना जर आपल्यात अहंकार तयार झाला.. आणि त्या अहंकाराच्या पोटी जन्माला येणारे लबाडी.. अप्रामाणिकपणा आदी विकारांनी पछाडून तो आपल्या मुळ ईश्वरीय धेय्या पासून दूर जायला लागला तर स्वामी तात्काळ संकेत देतात..आणि आपल्याला आपल्या मूळ धेय्याची आठवण करवून देतात.. जसे वरील लीलेत मल्लु दुधाचा व्यवसायीक होता.. त्याला ह्या गोष्टीचा विसरच पडला कि आज आपण जे काही आहोत.. ते मात्र स्वामींमुळे आहोत.. परंतु मल्लूला त्याचा अहंकार झाला आणि त्यात लोभा पोटी दुप्पट किंमत घेतली
आणि इतकेच नाही तर त्याने अप्रामाणिकपणाचा कळस गाठत.. दुधात पाणी मिसळले.. आणि वरील लीलेत स्वामींनी चमत्कार करवून त्यास वठणीवर आणले..!! स्वामी भक्त हो !! वरील लीलेचा संदर्भ घेता आपल्याला स्वामींची कृतीशील अनन्य भक्ती करायची आहे.. संत सावतामाळी असेल.. वा संत गोरा कुंभार असेल.. ह्या संत मंडळींचा आदर्श समोर ठेवून प्रपंच आणि परमार्थाचा मध्यबिंदू साधायचा आहे…. आणि मोठी मोठी धेय्य ठेवून हृदयात स्वामींच्या प्रती संपूर्ण समर्पणाची भावना ठेवून… आपले कर्म अतिशय प्रामाणिकपणे करायचे आहे.. पृथ्वीवरील आपले पात्र उत्कृष्ट निभवायचे आहे.. आणि हे करत असतांना मायेच्या प्रभावाने चूक झाली तर नाक घासून स्वामींची माफी मागायची आहे.. आणि पुन्हा नव्या जोमाने उभे प्रयत्न करायचे आहे.. स्वामींना खऱ्या अर्थाने भूषणावह होईल असे वागायचे आहे.. चला तर मग आज स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामी समर्था..!! ह्या पृथ्वीवरील रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहे.. ते उत्कृष्टपणे निभावून घे.. ह्या साठी माझ्या शरीरात जे जे आवश्यक गुण आहेत.. कौशल्य आहेत विकसित कर.. आणि तुला अपेक्षित परिणाम साध्य कर.. पण हे समर्था..!! हे करत असतांना मला तुझ्या अनन्य भक्तीची लस दे.. जेणे करून अहंकाररुपी व्हायरसची लागण मला होणार नाही.. आणि मी तुझ्या चरणापासुन दूर जाणार नाही.. हे देवा !! तु माझा पिता आहेस.. माता आहेस.. गुरु आहेस.. मला प्रेरणा दे.. मला मार्गदर्शन कर..!! ”बोला !! अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूतचिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट
निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






