स्वामी लीला
स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत असंख्य लीला करत होते.. स्वामींच्या लीला ह्या खरोखर अतर्क्य होत्या… अक्कलकोट मध्ये एक सरस्वती नावची सोनारीन स्त्री होती.. तिचे वागणे हे वेडसर असे.. परंतु तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती… कधी कधी ती जनाबाईचे अभंग म्हणून घळाघळा रडत आणि वेड्यासारखी रस्त्यातून फिरत असे.. तिच्याजवळ चिंध्यांचे एक गाठोडे असे व एक गाडगे … ह्या सोनारनीचे वैशिष्ट्य असे कि , तिला स्वामींच्या वाक्यांचा अर्थ कळत असे … इतकेच नव्हे तर एखादे वेळी स्वामी महाराज रागावले आहेत आणि त्यांचा राग शांत होत नाहीत.. त्या वेळेला सेवेकरी मंडळींनी मन्याबा आणि हि सरस्वती सोनारीन यांस शोधून आणत… मग पुढे मन्याबा व मागे हि सोनारीन , हातांत काठ्या घेऊन एकाने “ज्ञानोबा,तुकाराम ,” आणि दुसऱ्याने “बोडकीचे काय काम” असे भजन करून नाचू लागत… ते दोघे असे बोलू लागताच स्वामी महाराजांचा राग शांत होई आणि महाराज मोठमोठ्याने हसू लागत ,ते इतके किं ,त्यांचे अंग व पलंग सर्व हलत असे .अशी दोन दोन घटका गंमत चालत असे . असेच एकदा नरसोबाच्या वाडीची काही लोक दर्शनास आली होती .त्यांनी स्वामींस प्रश्न केला कि ,”स्वामी , आपण कोण आहात ?” महाराज म्हणाले ; “मूळ पुरुष ,वडाचे झाड ,दत्तनगर ”हे ऐकताच सोनारीन बोलली , “वटपत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत .” स्वामी भक्त हो !! खरोखर त्या वेड्या सोनारनीने असे उत्तर देताच सर्वांना आश्चर्य वाटे.. परब्रम्हाच्या वाणीची उकल एक वेड्या स्त्रीस होई.. ह्याला लीला नव्हे तर आणखी काय म्हणावे..!!
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध
स्वामी भक्त हो !! आजचा स्वामी बोध !! सरस्वती सोनारीन सह म्यानबा हे दोघेही वेडे होते.. परंतु स्वामींना सर्वात प्रिय होते.. वेद-उपनिषद-शास्त्र आदी ग्रंथ तोंडपाठ असलेल्या, ज्या ज्ञानी लोकांना स्वामींच्या वाणीची उकल होत नसे.. त्या वाणीचा अर्थ एका वेड्या स्त्रीला समजत ह्याला काय म्हणावे… खरोखर वाणी नि:शब्द होते आहे..असो.
आजच्या ह्या स्वामी लीलेतून आज आपणास आजच्या पिढी साठी स्वामी हाच संकेत देत आहेत कि, गुरुतत्वाचे मार्गदर्शन आपल्याला समजावून घ्यायचे असेल तर त्याच्या भक्तीत वेडेच व्हावे लागेल.. त्याच्या सोबत एकरूप व्हावे लागेल… असो. ह्या सह आजच्या लीलेत स्वामी कोण आहेत ह्या प्रश्नाचे उत्तर देता स्वामी बोलले कि, “ मूळ पुरुष ,वडाचे झाड ,दत्तनगर !! ” आणि ह्या स्वामी वाणीचा अर्थ सोनारणीने वरील लीलेत सांगितलाच आहे.. खरोखर तो मनन करण्यासारखा आहे.. ती सांगते कि, “ मूळ पुरुष म्हणजेच स्त्रोत कि ज्यातून अक्षय वडाच्या वृक्षाप्रमाणे हे अनंत कोटी ब्रम्हांडा प्रसरण पावते आहे.. आणि जो प्रत्येक पक्षी-कीटक-जीव सह मानवाला हृदयातून सतत मार्गदर्शन करतो आहे… असे गुरुतत्व (श्री दत्त).. अशी निर्गुण निराकार अवस्था म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज होय..!!. स्वामी भक्त हो !! खरतर “ मूळ पुरुष ,वडाचे झाड ,दत्तनगर !! ” हि स्वामी वाणी म्हणजे अनुभव आहे.. अनुभूती आहे.. बोध आहे.. हा शब्दात सांगणे अशक्य आहे.. आपल्याला ह्याचा स्वादच घ्यायचा आहे.. ह्या स्वामी वाणीचा अनुभव घेणे हेच प्रत्येक मानवाच्या जीवनाचे अंतिम धेय्य आहे.. आणि पुस्तकी ‘ज्ञानी पंडित’ होण्यापेक्षा ‘ वेडा भक्त ’ झालो तर नक्कीच वरील स्वामी वाणीचा स्वाद घेणे सहज शक्य आहे असे वाटते असो.
चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परमपिता परब्रम्हा श्री स्वामी समर्था !! तु मूळ पुरुष आहेस म्हणजेच ह्या अक्षय वटवृक्षा प्रमाणे विस्तारित होत चाललेल्या अनंत कोटी ब्रम्हांडाचा स्त्रोत तूच आहेस.. तूच प्रत्येकाच्या हृदयातून मार्गदर्शन करणारे श्रीगुरुतत्व आहेस.. हे स्वामीराया !! तु आमचा पिता आहेस.. आम्ही तुझे बाळे आहोत.. आम्हाला तुझ्या भक्तीत वेड कर.. ह्या भक्तीच्या शक्तीने आम्हा बाळांना आपल्या पित्याच्या मूळ स्वरूपाचा.. निर्गुण निराकार स्वरूपाचा अनुभव दे.. परमानंदाचा स्वाद दे… आणि ह्या परमानंदाचा प्रसाद वाटत.. ह्या मानवी जीवनाचे सार्थक करवून घे !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






