|| स्वामी लीला ||
अक्कलकोट नगरीत स्वामीं महाराज असंख्य लीला करत होते.. स्वामी महाराज प्रत्यक्ष कृतीद्वारे मार्गदर्शन करत होते.. अक्कलकोट दरबारात चोळप्पां आणि सुंदरबाई ह्यांचे मुख्यत्वे वर्चस्व होते.. स्वामी महाराज चोळप्पां ह्यांस जैन नावाने हाक मारत.. आणि सुंदरबाईस बोडकी म्हणून हाक मारत.. त्या दोघांमध्ये श्रेय घेण्यासाठी नेहमी चढाओढ लागे.. आणि ह्यातूनच कधीकधी वाद सुद्धा होत.. परंतु स्वामी भक्त हो !! तेथे जे निष्काम नित्सिम स्वामीभक्त होते.. त्यांची सुद्धा ह्या मध्ये कधीकधी पिळवणूक होत.. आणि हि पिळवणूक सुरु झाल्यास स्वतः स्वामी हस्तक्षेप करत.. आणि आपल्या नित्सिम भक्ताचे रक्षण करत.. त्याच्या अनन्य भक्तीला न्याय देत.. असेच एकदा श्री वामनबुवा ह्यांना वाटले कि उद्या आपण प्रात:काळी स्वामींना गंगेच्या पाण्याने स्नान घालावे.. आणि त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी वामनबुवा पहाटे लवकर उठले.. स्वामींच्या दरबारात आले.. तेव्हा स्वामीरायची स्वारी स्नानासाठी बसलेली होती.. वामनबुवा ह्यांनी गंगा जलाने भरलेले भांडे आपल्या हातात घेतले.. आणि हे गंगेचे पाणी स्वामींच्या अंगावर ओतण्याच्या तयारीत होते.. तेव्हा तेथे असलेले चोळप्पां आणि सुंदराबाई ह्यांनी श्री वामनबुवां ह्यांस हटकवले.. आणि त्यांस गंगाजल अपर्ण करण्यास मज्जाव केला.. त्या वेळेला वामनबुवा ह्यांस खूप वाईट वाटले.. आणि ते बाजूला जावून उभे राहिले.. स्वामी भक्त हो !! हा सर्व प्रकार स्वामींनी बघितला.. श्री वामनबुवा ह्यांच्या मनात स्वामींबद्दल अनन्य भाव होता… अत्यंत अनन्य भक्तीच्या भावनेने त्यांना स्वामींना स्नान घालायचे होते.. स्वामी भक्त हो !! आपले स्वामी भक्तवत्सल आहेत.. स्वामींना आपला भाव समजतो.. श्री वामनबुवा ह्यांच्या मनातील भाव स्वामींना समजला.. आणि स्वामी महाराज चोळप्पा आणि सुंदराबाईवर अत्यंत क्रोधीत झाले.. आणि श्री वामनबुवां ह्यांच्याकडे बघून बोलले “ अरे.. ह्या जैनास आणि बोड्कीस काय भितोस ? गंगा आण आणि टाक आमच्या अंगावर !! ”. प्रत्यक्ष ब्रम्हांडनायकाचा हुकुम आल्या नंतर चोळप्पां आणि सुंदरबाई शांतच झाल्या.. त्या नंतर श्री वामनबुवा ह्यांनी मोठ्या प्रेमाने स्वामींना गंगा स्नान घातले.. त्या नंतर रेशमी वस्त्र महाराजांच्या अंगावर घातले.. आणि अतिशय आनंदाने आपल्या बि-हाडी परत आले..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| स्वामी बोध ||
आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास अनन्य भक्तीची प्रेरणा देत आहेत.. आजच्या लीलेत चोळप्पां आणि सुंदराबाई हे आपल्याच मनातील नकारात्मक विचार.. भावना.. सवयीचे प्रतिक आहे.. आणि श्री वामनबुवा हे शुद्ध स्वामी भक्तीच्या भावनेचे प्रतिक आहे.. वरील लीलेचे जर आपण मनन चिंतन केले तर स्वामी आपणास असंख्य बोध देंतात… पैकी आज स्वामी आपणास सांगतात कि, जेव्हा जेव्हा आपल्या मनात अनन्य भक्तीचा भाव येतो.. आणि आपण त्याची अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न करतो.. तेव्हा आपल्यात असलेले नकारात्मक विचार त्याला आडवे येतात.. ते न्युनगंडाचे भाव निर्माण करतात.. भीतीचे भाव निर्माण करतात.. आणि आपल्याला अभिव्यक्ती करण्यापासून परावृत्त करतात.. स्वामी भक्त हो !! अशा वेळेला “ अरे जैनास आणि बोड्कीस काय भितोस..? ” म्हणजेच “ अरे .. ह्या नकारात्मक मनाला घाबरतोस कशाला.. तु माझा बाळ आहेस.. तुझ्यात साहस खचखचून भरलेले आहे.. घाबरू नकोस.. तुझे प्रामाणिक कर्म कर.. मी तुझ्या पाठीशी आहे.. तुला यश निश्चित आहे…!! ” ह्या आजच्या स्वामी वाणीचे स्मरण करायचे आहे.. बघा !! स्वामी भक्त हो !! आपल्याला यश निश्चित आहे.. ह्या सह आजच्या स्वामी वाणीचे आपल्या दैनदिन जीवनातील उदाहरण द्यायचे झाले तर.. समजा एखादा विद्यार्थी संकल्प करतो कि.. त्याला पहिला क्रमांक आणायचा आहे.. आणि तो अभ्यासाला सुरुवात करतो.. परंतु समजा त्याला या पूर्वी काही विषय अवघड गेलेले असतील.. तेव्हा त्याचे नकारात्मक मन त्या अवघड विषयाबद्दल सतत बडबड करते.. तो विषय किती अवघड आहे.. आणि ह्याचे पूर्वीच्या अनुभवाची चित्रफित डोळ्यासमोर निर्माण करून.. सतत सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन.. आणि जर आपण वेळीच ह्या नकारात्मक मनाला सावरले नाही तर.. ह्याचा परिणाम म्हणजे “ पहिला नंबर आणायचा आहे..!! ” हा त्याच्या मध्ये असलेला जोश.. उत्साह कमी होईल.. आणि शेवटी आपले धेय्य साध्य होणार नाही.. म्हणून आजच्या लीलेचे आपल्याला सतत स्मरण करायचे आहे.. स्वामी आपल्या पाठीशी आहेत हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून मोठीमोठी धेय्य साध्य करायचे आहे.. चला तर मग आज आपण प्रार्थना करू या “ हे ब्रम्हांडनायका !! जेव्हा माझे मन संकटासमोर हात टेकवते.. जेव्हा मी पूर्णपणे खचून जातो.. तेव्हा हे समर्था !! तु स्वतः येतोस.. माझ्या खांद्यावर हात ठेवतोस.. आणि बोलतोस..‘ अरे बाळा.. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे..!! ’ हे गुरुराया !! जेव्हा तुझे हे अभय वचन माझ्या कानी पडते.. तेव्हा माझ्या मनात अनन्य भक्तीचा संचार होतो.. माझा आत्मविश्वास उंचावतो.. आणि माझ्या कडून उत्कृष्ट कर्म करवून घेवून.. शेवटी सर्व संकटांना गुडघे टेकवण्यास भाग पाडतो..!! हे आई !! किती प्रेम करतोस तुझ्या बाळांवर..!! तुला अनंत कोटी धन्यवाद.. आई तुला अनंत कोटी धन्यवाद !!! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
संदर्भ :- www.SwamiVaani.com






