|| स्वामी लीला ||
स्वामी महाराज अक्कलकोट नगरीत येण्यापूर्वी काहीकाळ हिमालयात वास्तव्यात होते.. स्वामींनी येथे अनेक लोकांचा उद्धार केला.. अनेकांच्या जीवनात आत्मज्ञानाचा प्रकाश जागवला.. असेच एके दिवशी काही तपस्वी लोकांच्या गुहेत स्वामी महाराज तत्वज्ञान चर्चा करत होते.. चर्चा चांगलीच रंगली होती.. त्या वेळेला त्या गुहेच्या बाहेर दोन वाघ शांत बसलेले होते.. हे दोन्ही वाघ त्या परिसरात रहात.. त्यांनी कधीच कोणाला उपद्रव केला नाही..असो. स्वामीं येथील तपस्वी लोकांना मार्गदर्शन करत होते.. त्यावेळेला हे दोन वाघ स्वामींचे हितगुज अतिशय शांतपणे श्रवण करत होते.. इतक्यात स्वामींची दृष्टी ह्या दोन्ही वाघांवर गेली आणि स्वामींनी त्यांच्याकडे बघितले आणि बोलले “ अहो पंडित, तिकडे अंधारत काय बसला आहात..? इकडे पुढे या !! मागील जन्मात तुम्ही विद्वान म्हणून प्रसिद्ध होता.. तुम्हाला मान –सन्मान –पैसा सर्व काही प्राप्त झालेले होते.. तुम्ही देशीदेशी जावून जयपत्र घेतली.. तुम्हाला तुमच्या विद्वातेचा चांगलाच अहंकार झाला होता.. आणि ह्या मुळे तुम्ही अनेक पंडीतांचा अपमान केला.. साधू संत देवांचा धिक्कार केला.. आणि ह्या अनेक लोकांचा शाप लागून तुम्हाला हा वाघाचा जन्म प्राप्त झाला.. विद्या-धन-सत्ता ह्याने मदांध झालेल्यांना असेच दु:ख प्राप्त होते.. ” स्वामींच्या मुखातील परमपवित्र वाणी.. दोन्ही वाघांच्या कानावर पडली.. आणि ते स्वामींच्या समोर नतमस्तक झाले.. आणि नतमस्तक होऊन आता आम्हाला मुक्त करा.. आमचा अव्हेर करू नका.. जणू काही अशी भावनाच व्यक्त करत होते.. स्वामी भक्त हो !! स्वामी महाराज आई आहे.. स्वामींना त्या वाघांच्या मनातील भावना तात्काळ समजली.. आणि स्वामी बोलले “ अरे !! व्याघ्र जन्मात सद्गती भेटत नाही.. तुम्ही पुढील जन्मात काशी मध्ये विद्वान म्हणून जन्माला याल.. आणि आमची सेवा करून मुक्त व्हाल !! ” आणि असा आशीर्वाद देवून स्वामींनी त्यांना जाण्याची आज्ञा दिली.. आणि त्यानंतर ते दोघेही तेथून आपल्या स्थानी निघून गेले.. स्वामींची हि लीला येथील तपस्वी लोक बघत होते.. क्रूर-हिंसक वाघ सुद्धा स्वामींच्या समोर सहज नतमस्तक होतात.. स्वामींचे हे असीम प्रेमाचे सामर्थ्य बघून सर्वांना आश्चर्य वाटले आणि सर्वांनी स्वामींना नमस्कार करत जयजयकार केला..
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
|| बोध ||
आजची लीला खूपच प्रेरणादाई आहे.. आजच्या लीलेत असंख्य बोध भेटत आहे.. पैकी आजच्या लीलेत वर्णन केल्या प्रमाणे ज्ञान–विद्येचा अहंकार झाल्याने ब्राम्हणांना वाघाचा जन्म भेटला.. आणि ‘ अरे !! व्याघ्र जन्मात सद्गती भेटत नाही.. तुम्ही पुढील जन्मात काशी मध्ये विद्वान म्हणून जन्माला याल.. आणि आमची सेवा करून मुक्त व्हाल !! ’ ह्या स्वामी वाणीतून स्वामी महाराज स्पष्ट सांगत आहेत कि, मानव जन्म भेटणे हे महतपुण्याचे फळ आहे.. आणि मानवी जन्मातच आपण मुक्त होऊ शकतो.. स्वामी भक्त हो !! ‘मुक्ती’ हा शब्द ऐकला कि, आपल्यासारख्या प्रापंचिक माणसाला वाटते कि, मुक्ती प्राप्तीसाठी तर हिमालयात जावून खूप खडतर तप करावे लागते.. संसार सोडावा लागतो.. वगैरे वगैरे. थोडक्यात ‘मुक्ती’ हा प्रकार आपल्यासारख्या प्रापंचिक लोकांचा नाही.. वा ते आपल्याला जमणार नाही.. खरतर ‘मुक्ती’ म्हणजे ‘मनाच्या गुलामगीरीतून’ मुक्तता.. ‘मुक्ती’ म्हणजे मनावर विजय.. ‘मुक्ती’ म्हणजे आनंदी राहून कर्म करणे.. स्वामी भक्त हो !! आज आपण आपल्या मनाचे गुलाम आहोत.. ‘आनंदासाठी’ आपले मन आपल्याकडून बाह्य जगतात नित्य कर्म करवून घेते.. म्हणजे अमुक अमुक गोष्ट भेटली तरच मी आनंदी होईल.. अशा खोट्या धारणेत अडकवते.. थोडक्यात आपण आपला ‘आनंद’ त्या वस्तू मध्ये वा घटने मध्ये गहाण टाकतो.. पण सत्य हे आहे कि आपण स्वतः आनंदस्वरूप आहोत.. आपण परमआनंदाचे अंश आहोत.. आपण स्वामींचे अंश आहोत.. आणि जेव्हा आपल्याला हि समज प्राप्त होते.. तेव्हा आपण ‘आनंदासाठी’ कर्म नाही करत.. तर ‘आनंदी राहून’ कर्म करतो.. आणि आपल्या आनंदी स्वरूपावर राहून मनाकडून कर्म करवून घेणे.. ह्यालाच ‘मुक्ती’ असे म्हणतात.. खरतर हा विषय खूप मोठा आहे.. पण थोडक्यात सांगता.. ‘मुक्ती’ साठी बायकामुलांचा त्याग करणे वा संसार सोडणे ह्याची गरज नाही तर गरज आहे.. आपल्यातील मनाच्या नकारात्मक सवयी सोडण्याची.. त्यावर मात करण्याची.. आणि संत तुकोबा सह अनेक प्रापंचिक संत मंडळी ह्याचे उदाहरण आहेत.. म्हणून आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेतून बोध घेता.. हि समज प्राप्त करायची.. आजच्या लीलेत वाघांना स्वामींनी मानव जन्माचे महत्व सांगून मानव जन्मातच मुक्ती भेटते हि समज दिली.. आणि सुवार्ता हि आहे कि, आज आपला मानवाचाच जन्म आहे.. आणि खरोखर हे अनेक जन्मांच्या पुण्याईचे फळ आहे.. ह्यात नशिबाने आपल्या मुखात स्वामी नाम आहे.. म्हणून ह्याच मानव जन्मात.. मनाच्या पशुसमान असलेल्या विकारांवर मात करून.. मनाच्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे आहे.. स्वतंत्र व्हायचे आहे.. त्यावर विजय मिळवायचा आहे.. आणि आपल्यातील प्रेम- विश्वासाला मुक्त करायचे आहे.. आनंदाला मुक्त करायचे आहे.. वा कमीत कमी त्या दिशेने प्रयत्न सुरु करायचे आहे.. आणि ह्या प्रयत्नाचे पहिले पाऊल आहे.. स्वामी भक्ती.. स्वामी नाम.. स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहणे.. स्वामी माझे चांगलेच करत आहेत हा भाव मनात ठेवून… आणि आपण स्वामींचेच अंश आहोत हि समज ठेवून.. प्रेम, आनंद, शांती, समृद्धी, विश्वास, साहस, कृतज्ञता, क्षमा आदी आपले खरे गुण आहेत.. ह्या स्वरुपावर स्थिर राहून.. आपल्याला प्रपंचात राहून आपले आनंदी कर्म करणे होय.. बघा !! आपण आनंदी होऊच.. पण आपल्यामुळे आपले कुटुंब – समाज सर्वच आनंदी होण्यास सुरुवात होईल’. चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे परमपित्या !! जसे महासागरातून उसळणारी लाट हि त्या सागराचाच अविभाज्य भाग आहे.. अगदी तसे तू परमआनंदाचा महासागर आहेस.. मी तुझाच बाळ आहे.. तुझाच अंश आहे.. मी सुद्धा आनंद स्वरूप आहे.. हे स्वामी !! आज मला ह्या दिव्यसत्याची समज दिली.. तुला धन्यवाद !! आता हे श्री स्वामी समर्था.. माझी इतकीच प्रार्थना आहे कि, माझ्या मनात इतके आत्मबल दे कि , ह्या आत्मबलाच्या शक्तीने.. मी ह्या मनाच्याच नकारात्मक विकारांवर , सवयीवर सहज विजय मिळवेल आणि आनंदी स्वरूपावर राहून.. तुला अपेक्षित आनंदी जीवनाची अभिव्यक्ती करेन.. हे आई !! तू माझा गुरु आहेस.. मला प्रेरणा दे !! मला मार्गदर्शन कर !! ”
बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






