– उत्तर महाराष्ट्राला प्रथमच मिळाले राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधीत्त्व
– मान्यवरांनी सत्कार समारंभातून दिल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा
नाशिक ः बार कौन्सिल ऑफ इंडिया या राष्ट्रीय स्तरावरील संघटनेच्या सदस्यपदी ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.जयंत जायभावे यांची निवड जाहीर करण्यात आली होती. या संस्थेवर प्रतिनिधीत्त्व करण्याचा बहुमान उत्तर महाराष्ट्र व नाशिकला तब्बल ६२ वर्षांनंतर मिळाला आहे. यानिमित्त ॲड.जयंत जायभावे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. गोविंदनगर परीसरातील मनोहर गार्डन येथे झालेल्या भव्य सोहळ्यात विधी क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आजवरच्या कारकिर्दीत ॲड.जायभावे यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पना व त्यांच्यातील ज्ञानाचा उपयोग राष्ट्रीय स्तरावर होऊ शकेल, असा विश्वास मान्यवरांनी सत्कार समारंभात व्यक्त केला.
या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष माननीय ॲड. मनन कुमार मिश्रा, ॲडीशनल सॉलीसिटर ऑफ इंडिया माननीय ॲड.अनिल सिंग, महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल माननीय ॲड.अशुतोष कुंभकोणी, मुंबई उच्च न्यायालयातील सिनीयर कौन्सिल सुप्रिम कोर्ट ऑफ इंडिया माननीय ॲड.डॅरीयस जे. खंबाता, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष माननीय ॲड.वसंत साळुंके, उपाध्यक्ष माननीय ॲड.राजेंद्र उमप, बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यकारी समितीचे पदाधिकारी माननीय ॲड.अपूर्बा कुमार शर्मा, मध्य प्रदेश बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड.डॉ .विजयकुमार चौधरी, उत्तर प्रदेश बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. डॉ.अजय कोचर, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड. दिलीप पटेल, ॲड.डी. के. शर्मा, ॲड.अमित वैद आदी उपस्थित होते.
मान्यवरांनी ॲड.जयंत जायभावे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त करतांना, ही निवड ते सार्थ ठरवतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. गोसावी म्हणाले, समितीचे अध्यक्षपद भूषणविणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ॲड. जायभावे यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवितांना विधी क्षेत्रात अमुलाग्र योगदान दिले आहे आता राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करताना अशाच स्वरूपात महत्त्वपूर्ण योगदान त्यांच्याकडून दिले जाईल असा विश्वास आहे.
अण्णासाहेब पाटील म्हणाले, ऍड. जयंत जायभावे यांनी नेहमी प्रामाणिकपणा व वकिली व्यवसायासह वकिलांच्या हितांचा विचार केला आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर वकिलांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेली आहे.
प्रास्ताविकात नागरी सत्कार समितीचे उपाध्यक्ष ॲड.नितीन ठाकरे यांनी कार्यक्रम आयोजनामागील रुपरेषा सांगितली. तसेच ॲड.जायभावे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.मनिषा भामरे यांनी केले. नाशिक बार असोसिएशनचे सचिव ॲड.जालींदर ताडगे यांनी आभार मानले. मीना निकम यांनी राष्ट्र वंदना सादर केली व कार्यक्रमाचा समारोप झाला.
गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळापासून ॲड.जयंत जायभावे विधी शाखेत आपले योगदान देता आहेत. गेल्या तेरा वर्षांपासून ते महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य आहेत. त्यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवाचे उपाध्यक्ष व नंतर अध्यक्षपद देखील भुषविले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी बहुमान मिळाविला आहे. या संघटनेवर १९ उच्च न्यायालयातून प्रत्येकी एक प्रतिनिधीची निवड होत असते. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा यांच्यावतीने ॲड.जायभावे आता राष्ट्रीय स्तरावर नेतृत्त्व करणार आहेत. गेल्या ६२ वर्षांमध्ये प्रथमच उत्तर महाराष्ट्र व नाशिकला राष्ट्रीय सतरावर प्रतिनिधीत्त्व करण्याचा बहुमान मिळालेला आहे.
त्यांनी विधी शाखेशी निगडीत अनेक पुस्तके लिहिली आहेत. यात सिव्हील प्लीडींग, कन्वेन्सिंग ॲण्ड ड्राफ्टिंग (१९९६), क्रॉस एक्झामिनेशन (सिव्हील ॲण्ड क्रिमिनल) (१९९७), सी.पी.सी. ॲप्रोच टु सिव्हील ट्रायल (२००६), लॉ ऑफ विल्स (२००९) या पुस्तकांसह सी.पी.सी.वर आधारीत मराठी पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. इव्हिडंन्स ॲक्ट- ॲप्रोच टु सिव्हल ट्रायल (२०१५), व्हिजन डॉक्युमेंट ऑफ बार कौन्सिल (२०१९), बीएलईपी बुकलेट (२०२०) अशी प्रकाशित झालेल्या त्यांच्या पुस्तकांची नावे आहेत.



