नाशिक : छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावीत, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सूरज मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
भारत निवडणक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनाचालक परवाना, केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक/पोस्टाद्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉबकार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत देण्यात आलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र आणि खासदार व आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड मतदारांना ओळख पटविण्यासाठी ग्राह्य केली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
छायाचित्रासह मतदान ओळखपत्राने मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रावरील किरकोळ विसंगती दुर्लक्षित केल्या जातील. मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदार यादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांने वितरित केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारले जाईल. मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास अशा मतदारास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांपैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती श्री. मांढरे यांनी दिली.
‘ओळखीचा पुरावा म्हणून मतदार चिठ्ठी ग्राह्य नाही’
मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. मतदारांकडे आधारकार्डही असून अन्य अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांना छायाचित्रासह असलेली मतदार चिठ्ठी ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य मानली जाणार नाही, असा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आणावे.





