नाशिक : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपन्यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानात जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा यापूर्वेकडील आणि मध्य नाशिकमधील तालुक्यांमध्ये झालेले आहे. त्र्यंबक, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी आणि कळवण यातालुक्यांमध्ये काही प्रमाणात नुकसान झालेले आहे. द्राक्षबागांचे सर्वाधिक नुकसान निफाड, बागलाण, दिंडोरी, नाशिक आणि चांदवड या तालुक्यांमध्ये झालेले आहे. तसेच सर्वात जास्त नुकसान हे मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये झालेले आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी लागवडीखालील 7.40 लाख हेक्टरक्षेत्रापैकी प्राथमिक अंदाजानुसार साधारण 3.26 लाख हेक्टर म्हणजेच 50 टक्के पिकांचे नुकसान झालेले आहे. याअंतर्गत पीकनिहाय विचार केल्यास मका या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून जिल्ह्यातील एकूण 2.25 लाख हेक्टर क्षेत्रापैकी साधारणतः 60 ते 70 टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. 60 हजार हेक्टर क्षेत्रांमधील द्राक्ष बागांचे साधारण 70 टक्केपर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भात पिकाचे विशेष नुकसान झाले नसून बाजरी या पिकाचा पेरा 1.10 लाख हेक्टर होता त्याचे 50 ते 60 टक्के नुकसान झालेले आहे.

कडधान्य पिकांची आधीच कापणी झाल्यामुळे त्यांचे नुकसान झालेले नाही. सोयाबीन पिकाचा 73 हजार हेक्टर इतका पेरा असून त्यापैकी 80 टक्के नुकसान झाले आहे. लेट खरीप कांद्याचे 50 हजार हेक्टरपैकी साधारण 40 टक्के नुकसान झाले आहे. शासनाने पूर्वीच्या पंचनाम्याच्या सूचनांमध्ये सुधारणा केली असून अवकाळी पावसालादेखील 33 टक्के पेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले असेल तर पंचनामा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यामध्ये सुरू आहे. सर्व यंत्रणा क्षेत्रीय स्तरावर उपस्थित राहून पंचनामे करण्यात येत आहेत.
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सटाणा तालुक्यातील करंजडे व पिंगळवाडे या गावांना व आसपासच्या परिसराला भेट जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्याबाबत झालेल्या नुकसानीची क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून सखोल पाहणी करून त्याबाबतचा अहवाल लवकरात लवकर शासनात सादर करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी सांगितले.






