मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा (MAHA) चक्रीवादळामुळे दि. 6 नोव्हेंबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019 पर्यंत उत्तर कोकणासह उत्तर मध्य महाराष्ट्राला मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त राहणार असल्याने मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा समुद्र किनारपट्टीवर येण्याचे देखील या सूचनेत कळविण्यात आले आहे. याबाबत योग्य त्या उपाययोजनेसह तयारीत राहण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे व कोणत्याही मदतीसाठी मंत्रालय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आल्याचे मंत्रालय नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ आले असून राज्यात विशेषत: ठाणे आणि पालघर जिल्ह्याला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. पुढील तीन दिवस (दि. 8 नोव्हेंबर पर्यंत) मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, जे मच्छिमार समुद्रात गेले आहेत, त्यांनी तातडीने परत यावे. परतताना जवळच्या बंदरांवर आसरा घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव अजोय महेता यांनी केले आहे.
चक्रीवादळामुळे पालघर, ठाणे तसेच मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.
नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या तुकड्या पुणे येथे तैनात असून आवश्यकता भासल्यास त्यांची मदत घेतली जाईल, खबरदारीचा उपाय म्हणून समुद्र किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले.






