मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण हल्ल्याला आज ११ वर्षं पूर्ण झाली. या हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना गंगापूर रोड वरील शहीद सर्कल येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
या हल्ल्यात १६६ निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईला तब्बल ६० तास वेठीस धरले होते. या हल्ल्यात मुंबई पोलीस दलाचेही मोठं नुकसान झालं. पोलीस दलातील १४ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहिद झाले होते. मात्र याआधी त्यांनी आपलं कर्तव्य निष्ठेने बजावत प्राणाची बाजी लावत ८ दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर तुकाराम ओंबळे यांच्यासारख्या निधड्या छातीच्या आणि शूर पोलीसामुळे भारताला पाकिस्तानविरोधातला सगळ्यात मोठा जिवंत पुरावा म्हणजेच दहशतवादी कसाब हाती लागला होता. तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे, विजय साळस्कर, अशोक कामटे, कॅप्टन संदीप उन्नीकृष्णन यांनी देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. या सगळ्या वीरांच्या बलिदानाचं स्मरण करून गंगापूर रोड वरील शहीद चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष अॅड.चिन्मय गाढे, डॉ.संदीप चव्हाण, सचिन जोशी, संतोष भुजबळ, सचिन बिडकर, करण आरोटे, भूषण गायकवाड, दत्तात्रय माळोदे, संतोष पुंड, लालसिंग जाधव, रोहित जाधव आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





