नाशिक,दि.९ डिसेंबर :- नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आघाडी सरकारच्या काळात बोट क्लबसह अत्यंत महत्वपूर्ण असलेले प्रकल्प पूर्ण होऊनही गेल्या पाच वर्षात सुरू न होऊ शकलेले प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यास प्राधान्य असेल अशी माहिती राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. छगन भुजबळ यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना दिली. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर छगन भुजबळ हे पहिल्यांदाच दोनदिवसीय नाशिक दौऱयावर आहे. त्यानिमित्ताने आज नाशिक येथील कार्यालयात जिल्हाभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी त्यांची भेट घेऊन स्वागत केले.
माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना छगन भुजबळ पुढे म्हणाले की, गेल्या महिनाभरापासून सरकार स्थापनेच्या घडामोडी सुरू असल्याने महिन्यापेक्षा जास्त काळ नाशिक आणि येवल्याला येऊ शकलो नाही.मुंबईत होत असलेल्या घडामोडींमुळे मुंबईत थांबणे अत्यंत आवश्यक होते. त्यानंतर दि. २८ नोव्हेंबर रोजी शपथविधी झाल्यानंतर मंत्रालयीन कामकाज देखील सुरू झाले आहे. त्यामुळे नाशिकला येण्यासाठी उशीर झाला असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, सन १९९१ साली पहिल्यांदा मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर २५ वर्षात मंत्रीपदावर काम।केले. मात्र गेल्या पाच वर्षांचा कालावधी भुजबळ कुटुंबीयांसाठी अत्यंत खडतर होता. अशा वेळी भुजबळ संपले अशा वार्ता पसरविल्या जात होत्या. मात्र मतदारसंघातील जनता आणि पवार साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा राजकीय पुनर्जन्म झाला. आणि मंत्रीपदावर काम करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळाली याचा मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिक जिल्हयातील बोट क्लब, कलाग्राम, मनोरंजन पार्क, ग्रेप पार्क रिसॉर्ट यासारखे अनेक महत्वाचे प्रकल्प पूर्ण केले. मात्र गेल्या पाच वर्षात का सुरू होऊ शकले नाही हाही एक प्रश्नच आहे. मात्र आता हे सर्व रखडलेले प्रकल्प तसेच नव्याने काही प्रकल्प मार्गी लावले जातील असे त्यांनी सांगितले. तसेच नाशिक जिल्ह्यातील बंद पडलेले उद्योग सुरू करण्यासाठी तसेच अधिक नवीन वाढण्यासाठी प्रयन्त केला जाईल असे त्यांनी सांगितले.
अत्याचारांच्या घटनेवर बोलतांना ते म्हणाले की, समाजात विकृत गुन्ह्यांची वाढ झाली आहे. अत्याचाराच्या घटना या अत्यंत वेदनादायी असून नागरिकांनी आपली मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. या घटना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाईल. तसेच यावर जो त्वरीत कारवाई करत नाही तो पोलीस अधिकारी जबाबदार धरला जाईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
खातेवाटपाबाबत ते म्हणाले की, खातेवाटप हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. येत्या काही दिवसात हा प्रश्न मिटेल. ते म्हणाले की, अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद मिळावं याला माझा विरोध नाही. उलट त्यांना परत आणण्यासाठी मी स्वतः प्रयन्त केले आहे. त्यांना पद देण्याचा अधिकार हा पवार साहेबांचा असल्याचे त्यांनी सांगितले. या सरकारमध्ये सर्व पक्षातील अनुभवी नेते आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ द्या,मग टीका करा असे सांगत रात्रीतून शपथ घेणं हा धोका असल्याची टीका त्यांना केली
जेष्ठ नेते एकनाथ यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, एकनाथ खडसे मला भेटले आहे. आणि कामानिमित्त नेहमीच भेटत असतात. भाजपात ओबीसी नेते नाराज या खडसेंच्या आरोपात तथ्य आहे. मात्र हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. खडसे कोणाला भेटले म्हणजे त्या पक्षात गेले असा अर्थ होत नाही असे सांगत खडसे अनुभवी नेते असून ते योग्य निर्णय घेतील असेही ते म्हणाले.






