नाशिक :- सन 2019-20 या वर्षात प्राप्त झालेला निधी वेळेत योग्यरितीने खर्च करण्यात यावा व उर्वरित कामे गतीमानतेने करुन लोकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्यात असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कृषी मंत्री व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, खासदार हेमंत गोडसे, भारती पवार, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिलहाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, जिल्हा नियोजन अधिकारी योगेश चौधरी आदी उपस्थित होते.
2019-2020 या वर्षी सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना व अनु.जाती उपयोजना मिळुन 791.23 कोटीचा नियतव्यय मंजुर करण्यात आला होता. यापैकी 187.58 कोटी रुपयांचा निधी विविध यंत्रणांना वितरीत करण्यात आला असुन त्यापैकी 164.64 कोटी रुपये खर्च झाला आहे. प्राप्त निधीच्या तुलनेत खर्चाची टक्केवारी फक्त 35 टक्के दिसुन आली आहे. या संदर्भात सर्व संबधित यंत्रणांनी कामात गतीमानता आणुन सर्व निधी वेळेत खर्च होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात यावेत अशा सूचनाही पालकमंत्री यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमदार यांनी बैठकीत स्थानिक पातळीवर झालेल्या कामांची माहिती देऊन जिल्हा परिषदेअंतर्गत झालेल्या कामांवर चर्चा करण्यात आली. प्रलंबित व उर्वरित कामांचा सबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेण्यात आला. त्याअनुषंगाने विकासाची कामे तात्काळ पुर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी दिले.
श्री. माने म्हणाले, निधी अर्थसंकल्पीत झाल्यावर पुढील वर्षाच्या कामांचे नियोजन केल्यास प्रस्तावित कामे संबंधित विभागांना वेळेत पूर्ण करणे शक्य होईल. त्यादृष्टीने विभाग प्रमुखांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले.
यावर्षी झालेल्या निवडणूकांची आचारसंहिता, दुष्काळ व अवकाळी पाऊस अशा समस्यांमुळे प्राप्त निधी कमी प्रमाणात खर्च झाला आहे. परंतू उर्वरित कालावधीत निधी 100 टक्के खर्च करण्याचे आवश्यक ते नियोजन करुन सर्व विभाग प्रमुखांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. सन 2020-2021 मध्ये प्राप्त होणारा निधी मानवी विकास आराखड्यानुसार खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असून आरोग्य, शिक्षण, रोजगार व नागरीकांच्या मुलभूत सुविधा या बाबींचा प्रामुख्याने या आराखड्यात विचार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मागील अपूर्ण प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्याचा देखिल प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्याला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने जिल्हयातील वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय बाबी सर्वांसमोर आणण्यादृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रास्ताविकात दिली. या बैठकीत, विद्युत ट्रान्सफार्मर, ग्रामीण रस्ते यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीसाठी सर्व आमदार, जिल्हा परिषद सदस्य, विभाग प्रमुख उपस्थित होते.
स्वान रिसर्च फाऊंडेशनच्या नॉलेज नेक्स्ट ‘नासा ट्रेनिंग प्रोग्राम’ निवडीसाठी सप्टेंबर मध्ये परीक्षा
Nashik : अमेरिकेतील नॅशनल एरोनोटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशनच्या (नासा) सहकार्याने हन्टस्वीले,...




