नाशिक –कोणत्याही शहराचा विकास हा त्या शहरापासून अन्य शहरापर्यंतच्या दळणवळणांची साधने, रस्ते व रेल्वेचे जाळे, विमानसेवा यावर अवलंबून असतो. दळणवळण चांगले असले तर शहराच्या अर्थकारण, रोजगार यावर सकारात्मक परिणाम होऊन शहराचे ब्रांन्डीग होण्यास मदत होते. शहराचे ब्रांन्डीग व्हावे या उद्देशाने कार्यरत बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्थेपैकी एक क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शिष्टमंडळाने आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना शहराच्या कनेक्टीव्हीटी बाबत निवेदन दिले. या शिष्टमंडळाचे नेतृत्व खा. हेमंत गोडसे यांनी केले. शिष्टमंडळात क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष उमेश वानखेडे, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, अनंत ठाकरे, नाईसचे संचालक संजीव नारंग यांचा समावेश होता.
क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे देण्यात आलेल्या निवेदनातील मुद्दे –१) नाशिक ते घोटी येथील समृद्धी महामार्गापर्यंत सिक्स लेन सुपर एक्सप्रेस हायवे तयार करावा (हे अंतर फक्त २० ते २५ किमी एवठेच आहे) जेणेकरून नाशिक – घोटी व्हाया समृद्धी महामार्गाने मुंबईस जाण्यासाठी सुपर एक्सप्रेस वे मिळेल.२) नाशिकहून पेठ मार्गे गुजरातकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ तसेच वणी ते सापुतारा हा राज्य महामार्ग क्र. १७ याचे काम गेल्या दोन वर्षापासून अत्यंत धिम्या गतीने सुरु आहे. या कामास गती देऊन ते काम त्वरित पूर्ण करावे जेणेकरून नाशिकमार्गे गुजरातकडे जाणे सुलभ होईल. तसेच नाशिक – दिंडोरी – सापुतारा या राज्य महामार्ग क्र. १७ चे रुपांतरण राष्ट्रीय महामार्गात करावे.३) प्रस्तावित सुरत – हैदराबाद हा एक्सप्रेस वे नाशिक शहरातून जात असून त्याला नाशिकमध्ये एन्ट्री व एक्झिट द्यावा.४) नाशिक – पुणे रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून फक्त या रस्त्यावरील नारायणगाव, मंचर व राजगुरुनगर या गावालगतच्या बायपासचे काम अपूर्ण असल्याने नाशिकहून पुण्यास जातांना पाऊण ते एक तासाचा कालावधी अधिक लागतो. हे बायपासचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत. ५) तसेच महाराष्ट्राचे नेते तथा केंद्रीय मंत्री या नात्याने आपण नाशिकच्या हवाई सेवेसाठी विशेष प्रयत्न करावे हि विनंती देखील क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे करण्यात आली. याबाबत निवेदनामध्ये असे म्हटले आहे की, काही महिन्यांपूर्वीपासून जेट एअरवेज ची नाशिक – दिल्ली विमानसेवा बंद झाली. नाशिक – दिल्ली हि विमानसेवा सुरु करण्यासाठी अन्य विमान कंपन्या इच्छुक असून जेट एअरवेज कडून सदर रूट इतर इच्छुक कंपन्यांना हस्तांतर करणे आवश्यक असून सदर हस्तांतरणाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी प्रयत्न करावा. तसेच सध्या नाशिकहून सुरु असलेल्या पुणे, हैदराबाद व अहमदाबाद विमानसेवेस चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर उडान योजनेंतर्गत मंजूर झालेली बंगलोर, गोवा, हिंडन या शहरांसाठी विमानसेवा देखील लवकरात लवकर सुरु करावी.सदर मागण्यांबाबत सहानुभूतीपूर्वक व सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नितीन गडकरी यांनी दिले.





