महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त “प्रकाशपर्व” चे आयोजन
नाशिक: अत्यावश्यक सेवा देणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱयांनी “प्रकाशपर्व” च्या माध्यमातून मनोरंजनासोबतच आपसात स्नेहभाव वृद्धिंगत होण्यासाठी मिळालेली ही नवऊर्जा दैनंदिन कार्यात व सेवेत वापरून महावितरणचा विकास साधावा असे प्रतिपादन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले महावितरणच्या १७ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित नाशिक परिमंडळ कार्यालय व नाशिक मंडळातील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी स्नेहमेळावा “प्रकाशपर्व” या कार्यक्रमाचे आयोजन ०५ जून ला रविवारी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृह येथे करण्यात आले होते, त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व पायाभूत आराखडा विभागाचे अधिक्षक अभियंता संजय खंडारे हे उपस्थित होते.
महावितरणच्या माध्यमातून ग्राहकसेवा देत असताना आपल्याला २४x७ कार्य करावे लागते, त्यामुळे बऱ्याचदा सकाळी ते रात्री झोपेपर्यंत विविध ताणतणाव, चिंता व जबाबदारी असलीतरी याबाबींवर सकारात्मकतेने मात करून व आलेली मरगळ काढून टाकून ग्राहकांच्या सेवेसाठी व महावितरणचा नावलौकिक आणखी वाढविण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे. अशा कार्यक्रमांमधून आनंद घेऊन वैयत्तिक जीवनासह सामाजिक क्षेत्रातसुद्धा प्रकाशपर्वाची रंगत वाढवली पाहिजे असेही आवाहन मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी केले. सोबतच अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर व संजय खंडारे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कर्मचाऱ्यांनी तथा कर्मचार्याच्या कुटूंबातील सदस्यांनी यावेळी विविधकला सादर केल्या यामध्ये प्रदीप गवई, इसोकार, वैशाली लहाने, स्वरा महाजन, आराध्या कुऱ्हाडे, स्वरा चालीकवार, योगिनी काटे, राधा शेलार, ज्ञानेश्वर शेवरे, कस्तुरी कातकाडे, सुशील पन्हाड, निलेश चालीकवार, किरण जाधव, श्रुती दांगट, प्रशांत सोनावणे, श्रावणी सोमवंशी, चिदानंद फाळके इत्यादींनी विविध गाणी, नृत्य यावेळी सादर केले. तदनंतर सुप्रसिद्ध साहित्यिक व कवी अँड. अनंत खेळकर यांनी हास्य-धबधबा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम यावेळी सादर केला. यामाध्यमातून विविध कथा व कविता यांच्या माध्यमातून उपस्थिताना खळखळून हसविले. शेवटी सादर करण्यात आलेल्या आर्केस्टामधील कलावंतांनी एकापेक्षा एक सुमधुर गीत गायन करून सर्वांची वाहवा मिळवली व शेवटपर्यंत श्रोत्यांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कोव्हीड या आजारामुळे व विद्युत अपघातामुळे महावितरणचे जे अधिकारी कर्मचारी यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महावितरण वर्धापन दिनानिमित्त यावेळी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्यासह उपस्थित सर्व चिमुकल्या मुलामुलींसह मिळून केक कापण्यात आला. शेवटी सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे, सहाय्यक अभियंता चिदानंद फाळके आणि वैष्णवी लोकनार यांनी केले. कार्यक्रमाला सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, क्षेत्रीय अभियंते,कर्मचारी व जनमित्र बहुसंख्येने उपस्थित होते.





