नाशिक मधील तीन चॅप्टर चा पदग्रहण सोहोळा संपन्न
नाशिक – सुमारे 35 वर्षांपूर्वी भारतीय जैन संघटनेची सुरुवात महाराष्ट्रातून झाली आणि या संघटनेने समाजाला व देशाला एक नवी दिशा दाखवली. तेच काम भविष्यात देखील अविरतपणे सुरू राहील असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र लुंकड यांनी केले. ते नाशिकच्या तीन चॅप्टरच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी मंचावर विश्वस्त प्रकाशचंद्र सुराणा, राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब, राज्य प्रभारी नंदकिशोर साखला, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य सुरेश पाटील, राज्य उपाध्यक्ष दीपक चोपडा, उद्योजक नरेंद्र गोलिया व चेतन बोरा, अभय सेठीया, संघपती मंगलचंद साखला, मोहनलाल चोपडा, यतीश डुंगरवाल, अभय ब्रम्हेचा, ललित सुराणा, गोटू चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र लुंकड पुढे म्हणाले की, भगवान महावीर यांच्या शिकवणीप्रमाणे मनुष्य योनीमध्ये जन्म मिळणे हे अत्यंत दुर्लभ असून या जन्माचा उपयोग परोपकारासाठी करावा. जैन समाज तसेच अन्य सर्व समाजासाठी कार्य करणारी भारतीय जैन संघटना ही समाजाला बांधण्याची काम करत आहे.
शांतीलाल मुथा यांच्या प्रेरणेने 1985 ला सुरू झालेल्या भारतीय जैन संघटनेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून चांगल्या व सशक्त समाजाचे निर्माण हे राष्ट्रनिर्माणाचे काम आहे असेही त्यांनी नमूद केले.
प्रारंभी दीप प्रज्वलन व नवकार मंत्राने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. नाशिक विभागाचे अध्यक्ष अभय ब्रम्हेचा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यानंतर आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बोलतांना भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी नंदकिशोर साखला म्हणाले की, संघटना नैसर्गिक आपत्ती, शिक्षण व समाजकार्य या त्रिसूत्री मध्ये काम करते. धर्म, संस्कार, सेवा आणि समर्पण यासहित राष्ट्र निर्माण करण्यात संघटना अग्रेसर आहे.
बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार संघटनेने आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यकतेनुसार बदल केला असून नवीन पिढीसाठी राबविण्यात येणाऱ्या मूल्यवर्धन कार्यक्रमास अनुसरून अनेक राज्य सरकारांनी नितीमूल्ये शिक्षण हे शालेय शिक्षणात अंतर्भूत केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. बी जे एस 2.0 या संकल्पनेची सुरुवात संघटनेद्वारे करण्यात आली असून या अंतर्गत कार्यामध्ये अधिक सुसूत्रता आणून राज्यात लवकरच 100 चॅप्टर सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारतीय जैन संघटना दृष्टीपथात
1. जलसंधारण व जलसंवर्धन या क्षेत्रात 75 तालुक्यात काम. याचा विस्तार एक लाख गावात करणार.
2. मुलींसाठी “स्मार्ट गर्ल” या कार्यक्रमांतर्गत तीन लाखांहून अधिक मुली प्रशिक्षित.
3. विवाहातील खर्च कमी करण्यासाठी पुढाकार. विविध ठिकाणी सामुदायिक विवाहाचे आयोजन.
4. युवा व्यवसायिकांना मार्गदर्शन.
5. गेल्या 26 वर्षांपासून निशुल्क प्लास्टिक सर्जरी शिबिरा अंतर्गत 2.50 लाखाहून अधिक प्लास्टिक सर्जरी शस्त्रक्रिया.
6. कोविड काळात विविध स्तरावर समाजासाठी मदत.
कार्यक्रमामध्ये नाशिक शहर चॅप्टरचे अध्यक्ष सीए परेश बागरेचा, नाशिक रोड चॅप्टरचे अध्यक्ष मनीष शहा व नवीन नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष म्हणून डॉ. प्रमोद छोरीया यांनी आपल्या कार्यकारिणी सोबत पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पारख यांनी केले तर आभार सतीश डुंगरवाल यांनी मानले. कार्यक्रमास जैन समाजातील असंख्यजण उपस्थित होते.





