नाशिक दि. २५ ( प्रतिनिधी ) : आजच्या काळात केवळ राज्यातीलच नव्हे तर आपल्या देशातील शेतकऱ्यांपुढे अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम संकटे निर्माण होत आहेत, या संकटांवर मात करण्यासाठी कृषीथॉन सारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून ताकद व मार्गदर्शन मिळतेय, ही अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
कृषिक्षेत्राच्या विकासासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचे ठक्कर डोम, एबीबी सर्कल जवळ, त्र्यंबकरोड, नाशिक येथे दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान आयोजन करण्यात आले असून या कृषीथॉन प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात युवा सन्मान, युवा शेतकरी, उद्योजक, कार्य विस्तार पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी थोरात बोलत होते.
याप्रसंगी याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून
एसबीआयचे ग्रामीण महाव्यवस्थापक सत्यप्रकाश झा, माजी मंत्री शोभा बच्छाव, काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर आदि मान्यवर उपस्थित होते. तर व्यासपीठावर कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, संजय पाटील, माजी नगरसेवक हेमलता पाटील, वत्सला खैरे, ज्ञानेश्वर गायकवाड, राहुल दिवे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकऱ्यांच्या विकासासाठी विधायक कार्य करावे, या प्रेरणेतून कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर हे गेल्या २४ वर्षांपासून प्रयत्नशील असून दरवर्षी कृषीथॉन हे भव्य प्रदर्शन आयोजित करत आहेत, देशभरातील सर्वात सुंदर असे हे कृषी प्रदर्शन असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्यंत चांगल्या प्रकारचे प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळते. प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांपुढे अनेक संकटे निर्माण होतात, ती संपत नसतात जणू काही हजार तोंडांचा रावण शेतकऱ्यांसमोर उभा असतो, गारपीट, वादळे, बाजार भाव पडणे यासारख्या संकटावर मात करीत राज्यातील शेतकरी वाटचाल करीत आहे. असेही थोरात म्हणाले.
तसेच यावेळी थोरात म्हणाले की, सध्याच्या काळात शेतकऱ्यांकडून भात शेती, ऊस, बांबू, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी, कापूस, सोयाबीन, मोसंबी अशी विविध प्रकारची पिके राज्यातील अनेक प्रांतात घेतली जातात. परंतु या भागातील पिकांना भाव मिळणे गरजेचे आहे, नाशिक जिल्ह्यातील शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग व संशोधन करीत जणू काही कृषी विद्यापीठाचे कार्य करत असतो, अन्य भागातील शेतकऱ्यांनीही शेतीत नवनवीन पिके घेणे, नवे प्रयोग करणे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाशिक जिल्ह्याने कृषी क्षेत्रात अत्यंत आदर्श अशी कामगिरी केलेली आहे.
आजच्या काळात फळबागा, फुलबागा, भाजीपाला, कांदा अधिक क्षेत्रात नाशिक जिल्ह्याने अग्रक्रम मिळविला आहे. परंतु यापुढे कोणत्याही पिकावर औषध फवारणी करणे म्हणजे मानवी आरोग्याला घातक ठरणारे आहे, त्यामुळे विषमुक्त पिकांना मागणी असणार आहे, सहाजिकच सेंद्रिय शेतीला मोठ्या प्रमाणावर संधी असून यासाठी नाशिक, नगर, जळगावसह पश्चिम महाराष्ट्र इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही थोरात म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजक साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविकात प्रदर्शनाच्या आयोजनाबाबतची माहिती दिली. साहिल
न्याहारकर म्हणाले की, आयोजन करण्यात येत असून शेतकऱ्यांना नवनवीन कृषी संशोधनाची माहिती मिळावी, यासाठी
कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून
आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती देणे याकरिता परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी विविध क्षेत्रातील कृषी तज्ज्ञ आमंत्रित केले आहेत, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मान्यवरांचे स्वागत आयोजक साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सोनार यांनी केले. आभार प्रदर्शन सतीश पाटील यांनी केले. कार्यक्रमास नाशिक शहरातील कृषी संबधित उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रातील विविध मान्यवर जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






