नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात आयोजित होत असलेल्या चौदाव्या आंतराष्ट्रीय कृषी प्रदर्शन ‘कृषीथॉन’ मध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालय अखत्यारीतील – अपेडा, नाबार्ड व वित्तीय संस्थांचा सहभागा संदर्भात खासदार हेमंत गोडसे आणि कृषीथॉन चे संयोजक श्री.साहिल न्याहारकर यांनी केंद्रीय अर्थ मंत्री मा.ना.निर्मला सीतारमण यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
या भेटी दरम्यान कृषी क्षेत्राच्या अर्थकारणाविषयी अर्थमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केली. कृषी व्यवसायातील समस्या आणि उपाय या विषयावर बोलतांना कृषी उद्योगाशी निगडित विविध प्रक्रिया उद्योग, फार्मर प्रोड्युसर्स कंपनी आदींसाठी असलेल्या सवलती आणि योजनांची अंमलबजावणी करण्याकडे आमचा कल असून, शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार करत आमच्या सरकारने पेन्शन योजना देखील सुरु केली आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जात असून, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. कृषीथॉनच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची माहिती, मागणी आणि गुणवत्ता याबाबत जनजागृती करण्यात यावी. कृषीथॉनचे निमंत्रण स्वीकारतांना त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली व प्रदर्शनात केंद्रीय अर्थ मंत्रालय अखत्यारीतील कृषीशी निगडित संस्थांचा सहभाग होईल, असे आश्वासन दिले आहे.




