नाशिक : विविध धर्म, जाती, संस्कृती, भाषा यांमध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एका सूत्रामध्ये बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची हमी प्रत्येक भारतीयाला आपले संविधान देते.अशाच महान संवैधानिक मूल्यांचा जागर विद्यार्थी, युवक व नागरिकांमध्ये होण्यासाठी भारतीय संविधान विचार जागर स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन केल्याची माहिती इलाईट सर्टीफिकेशन ॲन्ड इनोव्हेटीव
सोल्यूशन्सचे संचालक आबासाहेब थोरात व स्वप्ना थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय संविधानास देशात लागू होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली असून, आजच्या काळातही संवैधानिक मूल्ये ही तितकीच प्रासंगिक व औचित्यपूर्ण आहे. संवैधानिक मूल्ये खऱ्या अर्थाने जर विद्यार्थ्यांमध्ये खोलवररुजली, तर भारत नक्कीच एक महाशक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. हाच उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून ही परीक्षा होणार असून विजेत्यांना लाखोंची बक्षिसे आणि प्रत्येक सहभागीस प्रमाणपत्र व पदक देण्यात
येणार आहे.
परीक्षेबाबत अधिक माहिती देताना थोरात म्हणाले की, महाराष्ट्र स्तरावर होणाऱ्या या संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेत सहभागी प्रत्येक स्पर्धकाला संविधान पुस्तकाची प्रत मोफत दिली जाणार आहे.स्पर्धकांसाठी तीन गट केले असून गट अ इयत्ता सातवी ते दहावी, गट ब ११ ते पदवी तसेच गट क सर्वांसाठी खुला आहे. स्पर्धेत सहभागासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून यासाठी संस्थेचे www.ecisindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध आहे. तीनही गटांमध्ये बक्षिसे विभागून दिली जातील. प्रथम पारितोषिक तीन लाख, द्वितीय पारितोषिक दोन लाख, तर तृतीय पारितोषिक एक लाख रुपये रोख असणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ भरघोस बक्षीसे देण्यात येणार आहेत.
महाराष्ट्र शासनाकडून ‘घर-घर संविधान’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या परीक्षेमुळे या उपक्रमास मोठा हातभार लागणार आहे. संविधानावरील या विचार जागर स्पर्धेत प्रत्येक घटकाने सहभागीहोऊन संविधानाची जाण वाढवून समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन थोरात यांनी केले आहे. भारतीय नागरिकांमध्ये संविधानाबाबत साक्षरता वाढीस लावण्याचा या परीक्षेमागे मुख्य हेतूअसल्याचे थोरात यांनी सांगितले.
संस्थेने यापूर्वी राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा गांधी यांच्यावर जिल्हास्तरीय परीक्षा घेतल्या आहेत. या परीक्षांद्वारे शहरासह ग्रामीण भागातीलविद्यार्थ्यांना लाखो रुपयांची बक्षिसेही माजी मंत्री छगन भुजबळ, छत्रपती संभाजीराजे, ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे, अभय
टिळक आदींच्या हस्ते समारंभपूर्वक वितरीत केली आहेत. यातील महात्मा गांधी विचार जागर स्पर्धा परीक्षेचे बक्षिस वितरण लवकरच होणार असल्याचीही माहिती यावेळी थोरात यांनी दिली. राज्यस्तरावर होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन संविधानाबाबत साक्षर होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
परीक्षेची वैशिष्ट्ये
•राज्यात प्रथमच सर्वांसाठी खुली परीक्षा
•परीक्षा ऑफलाइन स्वरूपाची असेल
•एकूण १०० गुणांची परीक्षा
•बहुपर्यायी प्रश्न ९० (प्रत्येकी १ गुण)
•दोन वर्णनात्मक प्रश्न (प्रत्येकी ५ गुण)
•निगेटिव्ह मार्किंग नाही





