स्वामी लीला ||
हैद्राबाद मध्ये विठ्ठल जमादार हे सत्विक वृत्तीचे गृहस्थ रहात होते..ते हैद्राबाद मधील प्रसिद्ध चंदुलाल ह्यांचे नातू नरेंद्र बहादूर यांच्याकडे कामाला होते.. विठ्ठलरावांची मिळकत अगदी जेमतेम होती.. कसाबसा ते आपल्या प्रपंचाचा गाडा ओढत चालले होते.. एके दिवशी एक साधु त्यांना भेटतो आणि ते त्या साधूला आपल्या ह्या कर्मदशेबद्दल विचारतो.. तेव्हा त्या साधूने त्यांस सल्ला दिला कि “ अक्कलकोट मध्ये एक अवतारी विभूती आहे.. त्यांच्या मात्र दर्शनाने तुमची प्रारब्धदशा विलीन होऊन तुमचे खूप छान दिवस सुरु होतील.. तुमचे कल्याण होईल..!! ”. हे ऐकताच विठ्ठलरावांच्या हृदयात एक आशेचा किरण जागृत झाला.. आणि ते अतिशय विश्वासाने.. सश्रद्धेने अक्कलकोट मध्ये आले.. अक्कलकोट मध्ये स्वामींच्या दरबारात आले.. असंख्य भक्तांची मनोकामना पूर्ण करणाऱ्या स्वामी माउली समोर हार श्रीफळ वाहून हात जोडून उभे राहिले.. इतक्यात स्वामींनी त्यांच्या कडे बघितले आणि बोलले “ काय रे..!! तुला किती धन हवे आहे..? आणि ते घेवून तू काय करशील..? ” . स्वामींची हि वाणी होताच श्री विठ्ठलराव अतिशय नम्रपणे बोलले “महाराज.. आपल्या कृपेने जितके मिळेल त्याचा चिरकाल यथोचित दानधर्म करेन..!! ” आणि त्यानंतर त्यांनी अतिशय आनंदाने स्वामींचे पूजन केले आणि हैद्राबाद मध्ये आले.. हैद्राबाद मध्ये आल्या नंतर मालक नरेंद्र बहादूर ह्यांस स्वामींचा प्रसाद दिला.. आणि स्वामींनी दिलेला आशीर्वाद सुद्धा सांगितला.. नरेंद्र बहादूर ह्यांस विठ्ठल जमादार ह्याचे वागणे खूपच भावले आणि त्यांनी त्यांस अजून काही महत्वाचे कामे दिले.. आणि विठ्ठलरावांनी सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे ती कामे तडीस नेली.. स्वामी कृपा झाली त्यांना लक्षावधीं द्रव्यांची प्राप्ती झाली.. पुढे ते स्वामींना दिलेल्या वचनाप्रमाणे यथोचित दानधर्म सुद्धा करत.. आणि स्वामी आज्ञे प्रमाणे आचरण केल्याने त्यांच्या भरपूर नावलौकिक झाला.. पुढे त्यांस जहागिरी आणि सरकारी वेतन सुद्धा प्राप्त झाले.. ते आता रा.रा. विठ्ठलराव जमादार म्हणून प्रसिद्ध आहेत..!!बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!
स्वामी बोध ||
आजच्या स्वामी वाणीतून स्वामी आपणास खूप छान बोध देत आहेत.. आपले स्वामी कृपेचा सागर आहे.. ते आपल्याला सतत देत आहेत.. परंतु हे सर्व घेत असतांना.. आपणास आध्यत्मिक जीवन आणि प्रापंचिक जीवन ह्यात समतोल साधायचा आहे.. प्रपंच म्हटला कि पैसा हा गरजेचा आहे… परंतु त्या बद्दलचे अज्ञान वा आसक्ती ह्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती खुंटण्याची शक्यता असते.. म्हणून आजच्या स्वामी वाणीतून बोध घेता आपणास स्वामींकडे मागण्याची कला शिकायची आहे.. जेव्हा आपण स्वामींकडे काही मागतो त्यामागील कार्यकारण भाव स्पष्ट करणे गरजेचे आहे.. कारण आजपर्यंत आपण जे मागत आलो ते मात्र अज्ञानात आणि बेहोशीत मागत आलो.. जसे अमुक अमुक ने गाडी घेतली म्हणून मला पण घ्यायची वा त्याचा अमुक अमुक लाखाचा बंगला आहे म्हणून मला पण घ्यायचा.. अशा पद्धतीने मागणे केल्याने आपल्यात मात्र अहंकार वाढत जातो.. पर्यायाने भरपूर धन असून सुद्धा आपण दु:खाला आमंत्रण देंत असतो.. आज आपणास आजच्या पिढीसाठी आजच्या लीलेचा संदर्भ घेता स्वामींनी विठ्ठलरावांस विचारलेला प्रश्न सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे.. “ तु ह्या धनाचे काय करशील ? ”. किंवा दुसऱ्या भाषेत स्वामी असे विचारात आहेत कि “ तु माझ्याकडे जे मागतो आहे.. ते का मागतो आहेस ? त्या मागील उद्देश्य काय आहे..? ” स्वामी भक्त हो !! हा सततचा प्रश्न शक्तिशाली प्रार्थनेचे रूप घेईल.. आणि जेव्हा जेव्हा आपण प्रामाणिक उत्तर देवू तेव्हा आपल्या अंतर्मनात दडून बसलेल्या चुकीच्या वृत्ती समोर येतील… आणि आपले मन शुद्ध होत जाईल.. आणि प्रपंच करता करता अंतरंगातून अव्यक्तिगत काम करण्याच्या घोषणा येवू लागतील.. आणि स्वामींना अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल..!! चला तर मग आज आपण स्वामींना प्रार्थना करू या “ हे स्वामी !! तू कृपेचा सागर आहेस.. मी जे जे काही मागतो.. ते तू मला लागलीच देतोस.. पण हे समर्था !! जेव्हा माझे मन मायेत जाते तेव्हा अज्ञान वा बेहोशीत मायेच्या गोष्टींना भुलून काहीही मागु शकते..!! पण हे आई..!! त्या वेळेला तू माझी प्रार्थना ऐकू नकोस.. मला सजग कर.. मला जागृत कर.. तु जे जे मला शिकवले त्याचे स्मरण दे..!! आणि त्यानंतर माझ्याकडून अशीच प्रार्थना करवून घे.. कि ज्याने तुला अपेक्षित जीवनाची अभिव्यक्ती होईल..!! हे दत्तात्रेया !! तू माझा गुरु आहेस.. मला मार्गदर्शन कर.. मला प्रेरणा दे !! ”बोला !! अनंतकोटी ब्रम्हांड नायक.. राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज कि जय !!






