नाशिकः कर्करोग उपचारात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरने आपल्या कामगिरी आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे. या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध प्रगत तंत्रज्ञान, अनुभवी व कुशल डॉक्टरांच्या प्रयत्नांतून २४ वर्षीय बांग्लादेशी युवकाला मृत्यूच्या दारातून बाहेर काढत जीवनदान दिले आहे. हॉस्पिटलमध्ये अतिशय जटिल शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याची माहिती एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक तथा चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ.राज नगरकर यांनी दिली.
अधिक माहिती देताना डॉ. राज नगरकर म्हणाले, ‘चोंड्रोब्लास्टिक ऑस्टिओसारकोमा’ (Chondroblastic Osteosarcoma) सारख्या अत्यंत दुर्मिळ आणि घातक कर्करोगाशी झुंज देणाऱ्या तारिक हसन याला या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे नवे आयुष्य मिळाले आहे. तारिक हसन हा युवक बांगलादेशचा रहिवासी आहे. त्याला नाकाच्या भागात कर्करोगाची गाठ झाली होती. कालांतराने ही गाठ डोळे आणि डोक्याच्या मागील भागापर्यंत पसरत गेली. तब्बल १२ सेंटीमीटर आकारापर्यंत वाढलेल्या या गाठीमुळे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली होती. बांग्लादेशातील डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेत जोखीम अधिक असल्याने हतबलता व्यक्त केली होती. आणि तारिककडे खूप कमी वेळ उरल्याचे त्याच्या कुटुंबाला सांगण्यात आले होते.
यांना नाशिकमधील एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरबाबत माहिती मिळाली. व त्यांनी नाशिक गाठत मदतीसाठी आर्त हाक दिली. अशा कठीण प्रसंगात तारिकच्या कुटुंबाने नाशिकमधील प्रख्यात सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. राज नगरकर यांच्याशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून डॉ. नगरकर यांनी शस्त्रक्रियेचे आव्हान स्वीकारले. आणि कुटुंबाला संकटसमयी मोठा दिलासा दिला.
शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीत सुधारणा
अत्यंत अचूकता आणि कौशल्याचा वापर करून डॉ. राज नगरकर यांनी तारिकच्या नाक व सभोवताली पसरलेली १२ सेंटीमीटरची गाठ पूर्णपणे यशस्वीरित्या काढली. शस्त्रक्रियेनंतर आता तारिकची प्रकृती वेगाने सुधारत आहे. सध्या त्याचे केमोथेरपी उपचार सुरू आहेत. लवकरच तो पूर्णपणे बरा होऊन आपल्या मायदेशी, बांग्लादेशला परतणार असल्याची माहिती दिली.
वेळेवर निर्णय घेतला,
अन् वाचले प्राण
याबाबत डॉ. राज नगरकर म्हणाले, “तारिकचा हा प्रवास प्रगत वैद्यकीय उपचार आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीचे उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक रुग्णाला जागतिक दर्जाचे उपचार आणि जगण्याची नवी संधी मिळावी, यासाठी ‘मानवता’ सदैव कटिबद्ध आहे.” अत्यंत गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये वेळेवर घेतलेला निर्णय आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन कशा प्रकारे प्राण वाचवू शकते, हे तारिकच्या या यशोगाथेने सिद्ध केले आहे. नाशिकचे एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर हे केवळ भारतच नव्हे, तर परदेशातील रुग्णांसाठीदेखील आशेचा एक मोठा किरण ठरत आहे






