नाशिक (पंचवटी एक्सप्रेस) : मुंबईतील ३७ वर्षीय महिला रुग्णाला साधारणतः १४ वर्षांपूर्वी अन्ननलिका आंकुचन पावण्याची गंभीर समस्या उद्भवली. आजार उद्भवण्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. अन् सुखासुखी संसाराची स्वप्न पाहत असताना अचानक आलेल्या विघ्नाने त्यांच्या मोठा आघात केला होता. त्यातच यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांना अन्ननलिकेच्या कर्करोगाचे निदान झाले. नाशिकच्या एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरमध्ये अन्ननलिका काढण्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया (रोबोटिक एसोफेजेक्टॉमी) मुळे साधारणतः १४ वर्षांपासून सुरु असलेल्या त्यांच्या संघर्षाला विराम मिळाला आहे. व त्यांनी इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर तोंडावाटे पहिला घास गिळला.
गेल्या १४ वर्षांपासून या महिला रुग्णाचे जग द्रव आणि मऊ आहारापुरते मर्यादित होते. कर्करोगाच्या परीणामांमुळे घसा आणि अन्ननलिकेच्या भागात निर्माण झालेल्या स्थितीमुळे त्यांना घास गिळणे अशक्य झाले होते. यासाठी त्यांना दीड दशकापासून वारंवार वेदनादायी डायलेटेशन प्रक्रियेला सामोरे जावे लागत होते. यावर्षी सप्टेंबरमध्ये त्यांच्या अन्ननलिकेच्या खालच्या भागात कर्करोगाची वाढ झाल्याचे निदान झाल्यावर हा संघर्ष अधिकच बिकट झाला.
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरचे चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कॉलॉजी ॲण्ड रोबोटिक सर्व्हिसेस प्रा. डॉ. राज नगरकर यांचे कौशल्य व त्यांच्या टीमची मिळालेली प्रभावी सहकार्याच्या जोरावर ट्यूमर काढण्यासाठी रुग्णावर त्वरित जटिल, कमीत कमी छेद (मिनिमली इनवेसिव्ह) असलेली रोबोटिक एसोफेजेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया संबंधित महिला रुग्णाच्या आयुष्यात परीवर्तनकारक बदल घडविणारी ठरली आहे.
असे झाले शस्त्रक्रियेचे फायदे..
रुग्णाची प्रकृती वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर पहिल्याच दिवशी त्यांना वॉर्डमध्ये हलवण्यात आले. दुसऱ्या दिवसापासून ट्यूबद्वारे आहार सुरू झाला. चौथ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या आठवड्याच्या अखेरीस, त्यांचे वैद्यकीय अहवाल सामान्य आले. ज्यामुळे त्यांना तोंडावाटे आहार सुरू करण्याची परवानगी मिळाली. १४ वर्षांहून अधिक काळानंतर सुरळितपणे घास गिळता आल्याचे सांगताना त्यांच्या चेहर्यावरील आनंद झळकत होता. हा क्षण रुग्ण, त्यांचे पती आणि संपूर्ण वैद्यकीय तज्ज्ञांसाठी अत्यंत भावनिक होता.
जीवनातील आनंद परत मिळविण्याचा यशस्वी लढाः डॉ.नगरकर
“काही विजय जगण्याच्या दरात मोजले जातात, तर काही आनंदाच्या अश्रूंमध्ये. रुग्णाला खाण्यासारखी साधी पण महत्त्वाची क्षमता परत मिळताना पाहणे, हा वैद्यकीय क्षेत्रातील सर्वात आनंददायी क्षणांपैकी एक आहे,” असे प्रा. डॉ. राज नगरकर (चीफ ऑफ सर्जिकल ऑन्कोलॉजी अँड रोबोटिक सर्व्हिसेस आणि किम्स मानवता हॉस्पिटल्स, एचसीजी मानवता कॅन्सर सेंटर आणि सिग्मा, नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक) यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, “आमच्या रोबोटिक-असिस्टेड शस्त्रक्रियेतील अचूकतेने ही जटिल शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा झाला. ही केस अनेक आघाड्यांवर आव्हानात्मक होती. एक दीर्घकालीन स्थिती, कर्करोगाचे झालेले निदान आणि रुग्णाची गिळण्याची क्षमता पुनर्संचयित करण्याची गरज. अशी प्रमुख आव्हानो आमच्यासमोर होती. रोबोटीक असिस्टेड शस्त्रक्रियेने अचूकता प्रदान केली, परंतु रुग्णाच्या अविश्वसनीय लवचिकतेने ही यशोगाथा लिहिली. हा केवळ कर्करोग काढून टाकण्याबद्दल नाही; तर जीवनातील एक मूलभूत आनंद परत देण्याच्या लढ्यातील विजय म्हणावा लागेल.अशा क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रोबोटिक शस्त्रक्रिया या शाखेतील क्षमता अधोरेखीत होतात. या प्रणालीमुळे जटिल शस्त्रक्रिया अधिक अचूकतेने करता येतात, रुग्ण लवकर बरा होतो, वेदना कमी होतात आणि परिणामदेखील चांगले मिळतात, असे डॉ.नगरकर यांनी नमूद केले.
एचसीजी मानवता कॅन्सर सेंटरबद्दल:
डॉ. राज नगरकर यांनी २००७ मध्ये स्थापित केलेले, एचजीजी मानवता कॅन्सर सेंटर (एचसीजीएमसीसी) हे मध्य भारतातील पहिले NABH-मान्यताप्राप्त रुग्णालय आहे. ५४ हून अधिक सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट, ९०० कर्मचारी आणि २७५ बेड क्षमतेसह, एचसीजीएमसीसी ही एक अग्रगण्य संस्था आहे, जी कर्करोगावर समग्र उपचार प्रदान करते. सर्जिकल, रेडिएशन आणि मेडिकल ऑन्कोलॉजीमध्ये विशेषज्ञ असलेल्या या केंद्राने आतापर्यंत ९५,००० शस्त्रक्रिया केल्या आहेत, ज्यात १,६०० हून अधिक रोबोटिक-सहाय्यक प्रक्रियेचा समावेश आहे.






