नाशिक : महाराष्ट्र ज्युडो असोसिएशन आणि नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिकच्या मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, पंचवटी येथे वरिष्ठ गटाच्या ४९ व्या महाराष्ट्र राज्य ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
या स्पर्धेचे उद्घाटन यशवंत व्यायाम शाळाचे अध्यक्ष दिपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नाशिकचे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, महाराष्ट्र ज्युडो असोसिएशनचे महासचिव शैलेश टिळक, ज्येष्ठ क्रीडा संघटक आणि नाशिक जिल्हा ज्युडो असोसिएशनचे सचिव डॉ रत्नाकर पटवर्धन, या स्पर्धेचे निरीक्षक अनिल सपकाळ, राज्य सहसचिव डॉ. गणेश शेटकर, राज्य कोषाध्यक्ष रवींद्र मेतकर, तांत्रिक समितीचे अध्यक्ष रवी पाटील, सचिव दत्ता आफळे, डॉ. सतीश पहाडे, सौ. अर्चना पहाडे, जयेन्द्र साखरे, सईचे प्रशिक्षक विजय पाटील, स्पर्धा संचालक शैलेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी खेळाडूंना संबोधित करतांना दिपक पाटील यांनी सांगितले की क्रीडा संघटक आणि क्रीडा संघटना खेळाडूंना चांगल्या सुविधा देत आहे. खेळाडूंनी मेहनत करून महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये उंचवावे असे सांगितले. यावेळी अविनाश टिळे यांनी सांगितले की शासनाचा क्रीडा विभाग आणि संघटना यांनी एकत्रितपणे खेळासाठी काम केल्यामुळे दर्जेदार खेळाडूं घडण्यास मदत होत आहे.
शैलेश टिळक यांनी सांगितले की महाराष्ट्र ज्युदो असोसिएशनला पुण्याच्या प्रथितयश उद्योग समूह पुनित बलान ग्रुपने पुढील तीन वर्षासाठी आर्थिक सहकार्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खेळाडूंना चांगल्या सुविधा मिळणार आहेत. तसेच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करावी यासाठी खेळाडूंना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आणि तांत्रिक प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही त्यांनी सांगितले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या २६ जिल्ह्यातून २५२ खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंचा समावेश आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणारे खेळाडूं अजिंक्य वैद्य, श्रद्धा चोपडे, अपूर्वा पाटील, समीक्षा शेलार, आदित्य धोपवकर, प्रदीप गायकवाड, शुभांगी राऊत यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उदघाटनानंतर विविध वजनी गटाच्या पुरुष आणि महिलांच्या स्पर्धांना सुरवात झाली.
यामध्ये महिलांच्या ६३ किलो वजनी गटात पुण्याच्या गौतमी कांचनने अंतिम लढतीत कोल्हापूरच्या रुध्वी श्रुंगारपुरेचा पराभव करून विजेतेपद मिळविले, तर भूमी कोरडे (मुंबई) आणि तन्वी पवार (सिंधुदुर्ग) यांनी संयुक्त तिसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या ७३ किलो वजनी गटात नागपूरच्या साईप्रसाद काळेने सुंदर खेळाचे प्रदर्शन करून अंतिम सामन्यात यवतमाळच्या अभिषेक दुधेचा पराभव करून या गटाचे विजेतेपद आपल्या नांवे केले. तर मुंबईच्या राहुल बोभडी आणि ठाण्याच्या आदर्श शेट्टीला संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड केली जाणार असून दिनांक १६ ते २० ऑगस्ट, २०२२ दरम्यान लखनौ येथे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील अशी माहिती आयोजकांनी दिली. या स्पर्धेचे संचालक म्हणून ठाण्याचे आंतरराष्ट्रीय पंच शैलेश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जिल्ह्यातील २० पंच कार्यरत आहेत. तर आंतरराष्ट्रीय पंच स्मिता शेट्टी, शिल्पा शेरिगर या मॅट प्रमुख म्हणून काम बघत आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पर्धा आयोजन समितीचे योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, स्वाती कणसे, सुहास मैद, माधव भट आदी प्रयत्नशील आहेत.
सामन्यांचे निकाल :-
महिला – ६३ किलो गट १) गौतमी कांचन -पुणे – प्रथम क्रमांक
२) रुध्वी श्रुंगारपुरे – कोल्हापूर – दुसरा क्रमांक
३) भूमी कोरडे – मुंबई आणि तन्वी पवार – सिंधुदुर्ग – संयुक्त तिसरा क्रमांक
महिला – ७० किलो गट १) समीक्षा शेलार – कोल्हापूर – प्रथम क्रमांक
२)तनुजा वाघ – नाशिक – दुसरा क्रमांक
३) प्रेक्षा बार्कर – ठाणे आणि आरती टकले -पुणे – संयुक्त तिसरा क्रमांक
महिला – ७८ किलो गट १) अपूर्वा पाटील -ठाणे – प्रथम क्रमांक
२) शाम्भवी कदम – मुंबई – दुसरा क्रमांक
३) नियती गुल्हाने – अमरावती आणि सानिका गायकवाड – कोल्हापूर – संयुक्त तिसरा क्रमांक
पुरुष – ७३ किलो गट १) साईप्रसाद काळे – नागपूर – प्रथम क्रमांक
२)अभिषेक दुधे – यवतमाळ – दुसरा क्रमांक
३)राहुल बोभडी – मुंबई आणि आदर्श शेट्टी – ठाणे – संयुक्त तिसरा क्रमांक






