नाशिक : वरवर निरोगी दिसणार्या मुलांमध्ये अचानक झटका येणे, शरीराच्या वारंवार विचित्र हालचाली होण्यास फेफरे ,फिटस् किंवा मिर्गी आकडी असे म्हणतात. हा मेंदूचा आजार आहे. फिटस् टाळता येत नसल्या तरी योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण राहते. तर शस्त्रक्रियेनंतर हा आजार बराही होऊ शकतो. अशीच शस्त्रक्रिया नारायणी हॉस्पिटलमध्ये डॉ. आनंद दिवाण व त्यांच्या टीमला करण्यास यश आले आहे. या शस्त्रक्रियेला इपिलेप्सी सर्जरी असे म्हणतात. ही सर्जरी अत्यंंत गुंतागुंतीची अन् अवघड अशी मानली जाते.
गेल्या दहा वर्षांपासून फिट या आजाराने ग्रस्त असलेल्या मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या मुलाला दिवसातून ४ ते ५ वेळा फिट यायची. बर्याचदा फिट येवून पडल्यामुळे इजाही व्हायची. अशात त्याला या आजारातून मुक्त करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार न्यूरोसर्जन व इपिलेप्सी स्पेशालिस्ट डॉ. आनंद दिवाण व त्यांच्या टीमला इपिलेप्सी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यास यश आले आहे. त्यांच्या टीममध्ये न्यूरोसर्जन डॉ. अशोक पिल्ले(केरळ), डॉ. समीर फुटाणे, डॉ. कर्डिले, भूलतज्ज्ञ डॉ. तुषार नेमाडे, रेडीओलॉजिस्ट डॉ प्रदीप नेमाडे व इतर हॉस्पीटल कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, इपिलेप्सी शस्त्रक्रिया ही अत्यंत गुंतागुंतीची आणि अवघड आहे. बर्याचदा रुग्ण औषधोपचाराला दाद न देत असल्यामुळे त्याच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यचाा डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. शस्त्रक्रियेद्वारे इपिलेप्सी म्हणजेच फिट हा आजार पूर्णपणे बरा करता येऊ शकतो. त्याचबरोबर फिटचे औषधेही बंद करता येऊ शकतात.
इपिलेप्सी सर्जरीसाठी ईसीजी व्हिडीओ, एमआरआय, पेट स्कॅन यासारख्या चाचण्या कराव्या लागतात. इपिलेप्सी शस्त्रक्रियेचा रुग्णाला फायदा होऊ शकतो काय? याचा अंदाज येऊ शकतो. त्यानंतरच रुग्णाची निवड करून त्यावर शस्त्रक्रिया केली जाते. शस्त्रक्रियेनंतर फिटचे औषधे हळूहळू बंद करता येऊ शकतात.
— फिट आल्यास लक्षणे —
मज्जा किंवा चेतासंस्थेच्या आजारांतला झटका केवळ दहा ते तीस सेकंदांचा असतो. काही वेळा त्यानंतर रुग्ण बेशुद्ध पडणे, डोळे पांढरे होणे, दातखिळी बसणे, कपड्यात लघवी होणे, संडास होऊन जाणे यासारख्या लक्षणांचा समावेश आहे. या आजारात तीव्र झटका हा एकाचवेळी संपूर्ण शरीरात येतो. यात तोंड, हातपाय तसेच शरीरातील अन्य स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. मेंदूकडे पोहोचणार्या संवेदना काही वेळासाठी यात खुंटतात, त्यामुळे यावेळी मेंदूत अधिक कंपने दिसून येतात. काहीवेळा तापाचे प्रमाण वाढल्याने फेफरे येतात. हा काळ काही मिनिटे असू शकतो.
—फीट आल्यास काय करावे, काय करू नये? —
— घाबरून जावू नये.
– दातखिळी बसल्यास तोंडात काही घालू नये व दातखिळी उघडण्याचे प्रयत्न करू नये.
– कांदा, चप्पलचा वास देऊ नये.
– तोंडाने काहीही खाण्यास, पिण्यास देऊ नये.
– फिट पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ राहिल्यास, त्वरीत दवाखान्यात घेऊन जाणे.
– कुठल्याही एका कुशीवर झोपू द्यावे.






