नाशिक : रुग्णांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी किम्स मानवता हॉस्पिटल, नाशिक येथे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. डॉ. ईशान नेरकर, न्यूरोसर्जन व स्पाईन सर्जन यांच्या यशस्वी उपचारांनंतर पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांसाठी त्रिरश्मी लेणी (पांडवलेणी) येथे एकदिवसीय ट्रेक आयोजित करण्यात आला.
“महाराष्ट्रात प्रथमच” अशा स्वरूपाचा हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचा दावा रुग्णालयाने केला असून, उपचारानंतरचे आयुष्य अधिक सक्रिय, आत्मविश्वासपूर्ण आणि निरोगी जगण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या ट्रेकमध्ये विविध वयोगटातील रुग्णांनी आपल्या कुटुंबीयांसह उत्साहाने सहभाग घेतला. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा चालणे, चढाई करणे आणि नियमित जीवनात आत्मविश्वासाने परतणे शक्य असल्याचा सकारात्मक संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
यावेळी डॉ. ईशान नेरकर यांनी रुग्णांशी संवाद साधत उपचारानंतर नियमित व्यायाम, योग्य आहार, फिजिओथेरपी, मानसिक आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व सांगितले. त्यांनी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना पुढील आरोग्यदायी जीवनासाठी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाद्वारे डॉक्टर, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ झाले. उपचारानंतरही रुग्णांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेणे ही किम्स मानवता हॉस्पिटलची बांधिलकी असल्याचे यावेळी सीओओ डॉ स्वानंद कुलकर्णी यांनी सांगितले .
या ट्रेकमध्ये हॉस्पिटलचे डॉक्टर, नर्सिंग व मार्केटिंग टीम यांनी सहभाग घेतला. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली.






