इंडियन अकॅडमी ऑफ पीडीयाट्रिक्स नाशिक शाखेचा पदग्रहण उत्साहात
नाशिक – आरोग्यविषयक समस्यांच्या सोडवणूकीसाठी विविध दिवस, सप्ताहांचे आयोजन केले जाते. या उपक्रमांमध्ये सहभागी होतांना तसेच माध्यम क्षेत्राच्या सहकार्याने आरोग्यविषयक जागृकता निर्माण करण्यावर भर द्यावा. आरोग्य सेवा देत असतांना सामाजिक बांधिलकी जोपासत राहा, असे प्रतिपादन इंडियन ॲकॅडेमी ऑफ पेडीयाट्रीक्सचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉ.सुभाष काश्यपे यांनी केले.
शालिमार भागातील आयएमए सभागृहात आयोजित इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडीयाट्रीक्स नाशिक डिस्ट्रीक्ट ब्रँन्चच्या नुतन कार्यकारणी पदग्रहण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर, नवनिर्वाचित सचिव डॉ.सचिन पाटील यांच्यासह मावळते अध्यक्ष डॉ.केदार मालवतकर, मावळते सचिव ऋषिकेश कुटे, नुतन कार्यकारणीतील खजिनदार डॉ.प्राची बिरारी, सहसचिव डॉ.मिलिंद गांगुर्डे, प्रेसिडेंट इलेक्ट डॉ.सचिन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.काश्यपे म्हणाले, सध्याच्या परीस्थितीत लठ्ठपणासह आरोग्यविषयक नवनवीन समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांचा आढावा घेतांना त्यांच्या सोडवणूकीसाठी प्रयत्न झाले पाहिजे. यासाठी बालरोग तज्ज्ञांची भूमिका महत्वाची असणार आहे.कार्यक्रमाप्रसंगी मावळते अध्यक्ष डॉ.मालवतकर व मावळते सिचव डॉ.कुटे यांनी संयुक्तरित्या त्यांच्या कार्यकाळात राबविलेले विविध उपक्रम व निर्णयांविषयीची माहितीचे सादरीकरण केले. मान्यवरांच्या उपस्थितीत नुतन कार्यकारणीच्या पदाधिकार्यांनी पदभार स्वीकारला. संपूर्ण कार्यकारणी सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्नेहल भामरे, व डॉ.जागृती विसपुते यांनी केले. तर डॉ.सचिन पाटील यांनी आभार मानले.

सामाजिक उपक्रम राबविण्यावर देणार भर : डॉ. भांडारकर
पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष डॉ.अनिरुद्ध भांडारकर म्हणाले, गेली २३ वर्षे विविध संस्था, संघटनांवर विविध पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे. परंतु बालरोग तज्ज्ञ म्हणून आपल्या मातृ संस्थेत अध्यक्षपद भूषवितांना मनस्वी आनंद होतो आहे. बदलत्या काळानुरुप अनेक नवी आव्हाने निर्माण झालेली असून, शाळांच्या स्तरावर उपक्रम राबवत जनजागृती करण्याचा मानस आहे. आपल्या कार्यशाळात ५ आदिवासी शाळा दत्तक घेत सामाजिक बांधिलकी जोपासणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.






